मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सुनील पाटील आर्यन खान प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप भाजपचे माजी पदाधिकारी मोहित कंबोज यांनी केला. पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे धुळे येथील कार्यकर्ते असून पक्षातील अनेक नेत्यांशी त्यांचे निकटचे संबंध आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषीकेश हा पाटील यांचा मित्र आहे. पाटील याला क्रूझ पार्टीची माहिती होती. पाटील याने एक ऑक्टोबर रोजी सॅम डिसूझा याला दूरध्वनी केला आणि राष्ट्रीय अंमली पदार्थविरोधी विभागाच्या (एनसीबी) अधिकाऱ्यांशी त्याच्या किरण गोसावी या माणसाशी संपर्क करून देण्याची विनंती केली होती. डिसूझा याने एनसीबीच्या व्ही. व्ही. सिंग यांच्याशी संपर्क साधला, असे कंबोज यांनी सांगितले. राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी हे आरोप फे टाळले आहेत. मूळ प्रकरणावरून लक्ष वळवण्यासाठी असे आरोप करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.