मुंबई : मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा यांच्या खंडपीठापुढे सोमवारी सुनावणी होणार आहे. ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखविल्यावर त्यावेळेपर्यंत अधिसूचना काढल्या न गेलेल्या काही नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी ते लागू करण्यात यावे, अशी मागणी आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडी सरकारने वाढीव लोकसंख्या गृहीत धरून प्रभागसंख्या वाढविली व नव्याने प्रभागरचना करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने हा निर्णय रद्द करून पुन्हा पूर्वीचीच प्रभागसंख्या निश्चित करण्यात आली. राज्य निवडणूक आयोगाचे प्रभागरचनेचे अधिकार राज्य सरकारने आपल्याकडे घेतले आहेत. या सर्व मुद्दय़ांवर आक्षेप घेणाऱ्या काही याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी होणार आहे. प्रभागरचनेबाबतच्या एका याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी घेण्यास काही दिवसांपूर्वी नकार दिला होता व आधी उच्च न्यायालयात जाण्याची सूचना केली होती. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय कोणत्या मुद्दय़ांवर निर्णय देणार आणि निवडणुका नेमक्या कधी होतील, याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.