क्षितीज प्रसादचा एनसीबी न्यायालयात आरोप

मुंबई : अंमलीपदार्थ नियंत्रण विभागाकडून (एनसीबी) आपला मानसिक आणि भावनिक छळ करण्यात आला. अंमली पदार्थाच्या प्रकरणात अभिनेता रणबीर कपूर, अर्जुन रामपाल आणि डिनो मोरिया यांना गोवण्यासाठी आपल्यावर दबाव टाकण्यात आल्याचा आरोप धर्मा प्रॉडक्शनच्या उपकंपनीचा माजी कार्यकारी निर्माता क्षितिज प्रसाद याने शनिवारी विशेष न्यायालयात के ला.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याला मृत्यूपूर्वी अंमलीपदार्थ उपलब्ध केल्याप्रकरणी प्रसाद सध्या अटकेत आहे.

क्षितीज प्रसादच्या कोठडीची मुदत संपल्याने शनिवारी त्याला अंमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (एनडीपीएस) स्थापन विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्या वेळी तपास यंत्रणेविरोधात काही तक्रार आहे का, अशी विचारणा न्यायालयातर्फे करण्यात  एनसीबीचे  अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर क्षितीज याने छळवणुकीचा आणि खोटा जबाब नोंदवण्यास दबाव टाकल्याचा आरोप के ला. त्याने आपले वकील सतीश मानेशिंदे यांच्यामार्फत आपले हे म्हणणे लेखी स्वरुपातही न्यायालयात सादर केले.

त्यात त्याने वानखेडे यांनी खोटय़ा जबाबांसाठी आणि अभिनेत्यांना गोवण्यासाठी आपली मानसिक, भावनिक छळवणूक केली. निर्माता-दिग्दर्शक करण जोहर आणि धर्मा प्रॉडक्शनसाठी काम करणाऱ्या काही व्यक्तींची नावे जबाबात लिहिण्यासाठी आपल्यावर दबाव आणण्यात आला. परंतु आपण या व्यक्तींना ओळखत नाही, असे सांगत ही नावे जबाबात लिहिण्यास नकार दिला. ते एवढय़ावरच थांबले नाहीत, तर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी आपल्याला अभिनेता रणबीर कपूर, अर्जुन रामपाल आणि डिनो मोरिया यांची नावे घेऊन त्यांना अडकवण्यासाठी दबाव आणला. त्यालाही नकार दिल्यामुळे त्यांनी आपली पत्नी व कुटुंबीयांना यात गोवण्याबद्दल धमकावले. त्यानंतर तपास अधिकाऱ्यांनी स्वत:च जबाब लिहून त्यावर बळजबरीने आपली स्वाक्षरी घेतल्याचा आरोपही क्षितीजने केला आहे.

अटकेनंतर २७ सप्टेंबरला न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर आपल्याला पहिल्यांदा कोठडीसाठी हजर करण्यात आले. त्या वेळीही एनसीबी छळवणुकीविषयी आपण न्यायालयाला सांगितले होते. न्यायालयानेही आपले म्हणणे नोंदवून घेत आपल्याला एनसीबीची कोठडी सुनावली होती. कोठडी मिळाल्यानंतर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी आपला अतिरक्त जबाब नोंदवून घेतला. त्यातही त्यांनी आपल्या मनाविरुद्घ अनेक गोष्टी लिहिल्या आणि त्यावरही बळजबरीने आपली स्वाक्षरी घेतली, असेही क्षितीजने म्हटले आहे.

एनसीबीचा दावा

एनसीबीने बळजबरीने जबाब लिहून घेतल्याचा आरोप क्षितीजने एकीकडे केला असताना तो तपासात अजिबात सहकार्य करत नसल्याचा दावा एनसीबीने न्यायालयासमोर केला. त्यानेच दिलेल्या कबुलीजबाबवर स्वाक्षरी करण्यासही नकार दिला. आपल्यावरील अजामीनपात्र गुन्हा मागे घेण्यात आला, तरच आपण कबुलीजबाबावर स्वाक्षरी करू, अशी अटही त्याने घातल्याचा करण्याची अट त्याने घातल्याचा दावा एनसीबीचे वकील अतुल सरपंदे यांनी केला.