आपल्या आवडत्या क्षेत्रात कारकिर्द घडवण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या महिलांना त्यांचे स्वप्न सत्यात आणण्यासाठी ‘स्वप्नांना पंख नवे’ नावाचा अनोखा उपक्रम राबवण्यात आला होता. ‘स्टार प्रवाह’ वाहिनी, ‘फेअर अँड लव्हली’ यांनी ‘लोकसत्ता’च्या सहकार्याने राबवलेल्या या उपक्रमातील यशस्वी महिलांचा सन्मान सोहळा शनिवार, २४ मे २०१४ रोजी संध्याकाळी सहा वाजता ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर प्रसारित करण्यात येणार आहे.
‘स्वप्नांना पंख नवे’ या उपक्रमासाठी राज्यातील विविध शहरांमधून ५० हजारहून अधिक महिलांनी ‘मिस्ड कॉल’ देऊन आपला सहभाग नोंदवला होता. प्राथमिक फेरीतून निवडल्या गेलेल्यामहिलांना प्रत्यक्षात ब्युटी अँड स्कीन केअरसाठी भरत व डोरिस गोडांबे, फॅशन डिझाईनिंगसाठी पूर्णिमा ओक, फुड अँड कॅ टरिंगसाठी अदिती लिमये-कामत तर अभिनयासाठी मृणाल कुलकर्णी यांसारख्या नामवंतांकडून मार्गदर्शन मिळाले. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानंतर घेण्यात आलेल्या स्पर्धाफेरीतून या उपक्रमातील विजेत्या महिलांची निवड करण्यात आली असून त्यांना त्याच क्षेत्रात उच्चशिक्षण घेण्यासाठी त्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.
या उपक्रमात मुंबईची दीपाली नवले ही फुड अँड कॅटरिंग विभागात, कोल्हापूरची सई पंडित हिला फॅशन डिझायनिंग विभागात, नाशिकच्या वैशाली पाटीलला ब्युटी अँड स्कीन केअर विभागात, पुण्याच्या स्नेहा लोंढेला अभिनय विभागात तर मुंबईच्याच रश्मी कोलतेला लघुउद्योग विभागात यश मिळाले आहे. या पाच जणींच्या कौतुक सोहळ्यासाठी ‘लगोरी’ मालिकेतील अभिनेत्री रेश्मा शिंदे व अनुजा साठे उपस्थित राहिल्या होत्या.
‘स्वप्नांना पंख नवे’ या उपक्रमात मिळवलेल्या यशाचा आनंदसोहळा साजरा करत असताना नाशिकच्या वैशाली पाटील हिने उपक्रमांतर्गत मिळत असलेल्या शिष्यवृत्तीमुळे आपले स्वप्न पूर्ण होणार आहेच. त्याचबरोबर तज्ज्ञांकडून मिळालेले अमूल्य मार्गदर्शनही आयुष्यभर साथ देत राहिल, अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. या सोहळ्याचे सूत्रसंचलन अभिनेत्री पल्लवी सुभाष हिने केले होते. स्वप्नपूर्तीच्या दिशेने एक पाऊल पुढे आलेल्या या यशस्विनींचा सन्मान सोहळा ‘स्टार प्रवाह’वर पहायला मिळेल.