मुंबई : औषध प्रतिरोधी एमडीआर आणि एक्सडीआर क्षयरुग्णांसाठी ‘एम बीपाल’ अशी नवी उपचार पद्धती विकसित केली असून त्याच्या तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचण्या मुंबईसह देशभरात सुरू होत आहेत. देशभरातील नऊ केंद्रापैकी मुंबईच्या गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात प्रथम या चाचण्या सुरू झाल्या असून दोन रुग्णांची नोंद झाली आहे. औषध प्रतिरोधी क्षयरोगाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून सध्या दर दोन मिनिटाला तीन रुग्णांचा मृत्यू होतो. त्यामुळे यावर उपाय शोधणे अधिक गरजेचे आहे. देशभरात नऊ केंद्रावरील ४०० रुग्णांवर याची चाचणी केली जाणार असून मुंबईतील दोन्ही केंद्रांवरील प्रत्येकी ५० रुग्णांचा यात समावेश केला जाणार आहे. ‘एम बीपाल’चे फायदे एम बीपालअंतर्गत बेडाक्युलीन, प्रिटोमनाईड आणि लिनॅझोलिड या तीन औषधांचा समावेश केलेला आहे. सध्या एमडीआर क्षयरोगी आणि एक्सडीआर क्षयरोगींना दिवसाला जवळपास १३ गोळय़ा घ्याव्या लागतात. तसेच सध्याच्या उपचार पद्धतीचा कालावधी १८ ते २४ महिने आहे. त्यामुळे त्याचे दुष्परिणामही खूप तीव्र आहेत. परिणामी रुग्ण कंटाळून उपचार सोडून देण्याचे प्रमाणही अधिक आहे. एम बीपाल उपचार पद्धतीमध्ये केवळ तीनच गोळय़ा घ्याव्या लागणार आहेत. तसेच या उपचार पद्धतीचा कालावधीही सहा महिन्यांचा आहे.