ठाणे महापालिकेच्या बीएसयूपी योजनेत घर मिळवून देतो असे सांगत एका दाम्पत्याने सुमारे २० जणांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दाम्पत्याने घर देण्याचे बहाण्याने २० जणांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. तक्रारदार हे ठाण्यात राहत असून २०१८ मध्ये त्यांची ओळख राजेश कदम या व्यक्तीसोबत झाली. आपण एका मोठ्या आयुक्ताला ओळखत असून ते बीएसयूपीची घरे कोट्यामधून मिळवून देतात असे राजेशने तक्रारदास सांगितले होते. माझी पत्नी प्रतिभा ही देखील महापालिकेत कर्मचारी आहे, असे राजेशने सांगितले होते. घराची रक्कम १२ लाख रुपये आहे आणि पत्नीच्या मदतीनेही बीएसयूपी योजनेत घर मिळवून देऊ शकतो, असे राजेशने तक्रारदाला सांगितले होते. कमी किमतीत घर मिळत असल्याने तक्रारदार यांनी राजेशला टप्प्याटप्प्याने ६ लाख रूपये दिले. २०१९ मध्ये राजेशने तक्रारदार यांना काही कागदपत्रे दिली. पण घराचा ताबा दिला नव्हता. त्यानंतर राजेशने त्यांना प्रतिसाद देणे बंद केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदार यांनी चितळसर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्याआधारे गुन्हा दाखल करण्यात आला. राजेशने अशाप्रकारे सुमारे १८ ते १९ जणांची फसवणूक केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे फसवणूकीच्या रकमेचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.