ठाणे येथील घोडबंदर रोड परिसरातील नवीन बांधकामांवर मुंबई उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. बांधकामे थांबवू शकतात पण माणसे पाण्याविना जगू शकत नाहीत, असे निरीक्षणही न्यायालयाने हा निर्णय देताना नोंदवले आहे. ठाणे शहरातील अनेक परिसरांतील नागरिकांना पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागते. काही भागांत पाणीकपातही केली जाते. नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. ठाणे महापालिकेकडूनही पुरेशी तरतूद केली जात नाही. मात्र, महापालिकेकडून नवीन बांधकामांना परवानगी दिली जात आहे. बांधकामांसाठी खूप पाणी लागते. त्यामुळे पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होत आहे. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर आज सुनावणी घेण्यात आली. बांधकामे थांबवली जाऊ शकतात. पण माणसे पाण्याविना जगू शकत नाहीत, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान नोंदवले. तसेच ठाणे घोडबंदर परिसरातील नवीन बांधकामांना बंदी घालण्याचा निर्णय दिला. ९ जूनपर्यंत महापालिकेकडे आलेल्या नव्या बांधकामांच्या प्रस्तावांना सीसी (मंजुरी प्रमाणपत्र) आणि बांधकामे पूर्ण झालेल्या बांधकामांना ओसी (भोगवटा प्रमाणपत्र) देऊ नये, असे आदेश ठाणे महापालिकेला दिले आहेत.