मुंबई: केंद्र सरकारकडून देशभरात तुरीची हमीभावाने खरेदी केली जात आहे. राज्यातूनही तूर खरेदीला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे नाफेड व एनसीसीएफच्या माध्यमातून सुरू असलेल्या तूर खरेदीची मुदत पंधरा दिवसांनी वाढवून मिळावी, अशी मागणी पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाकडे केली आहे.
राज्यात १ लाख ३७ हजार ४५८ शेतकऱ्यांची तूर खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी झाली आहे, त्यापैकी ५२ हजार ९७१ शेतकऱ्यांकडून ७७ हजार ५३ टन तूर खरेदी करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार खरेदी प्रक्रियेसाठी ९० दिवसांची मुदत १३ मे रोजी संपत आहे. उर्वरित नोंदणीकृत शेतकऱ्यांची तूर हमीभावाने खरेदी होण्यासाठी मुदतवाढ मिळावी, अशी मागणी आहे. त्यामुळे केंद्र सरकारने १३ मेपासून पुढे पंधरा दिवसांची मुदतवाढ वाढवून द्यावी, अशी विनंती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.
केंद्र सरकारने राज्याला सन २०२४-२५ च्या हंगामासाठी हमीभावाने २ लाख ९७ हजार ४३० टन तूर खरेदीला मंजुरी दिली आहे. त्या करिता नाफेड व एनसीसीएफ या केंद्रीय नोडल संस्थांच्या माध्यमातून राज्यातील आठ राज्यस्तरीय नोडल संस्था मार्फत ७६४ खरेदी केंद्र राज्यात कार्यान्वित आहेत. त्या खरेदी केंद्रात आत्तापर्यंत ५२ हजार ९७१ शेतकऱ्यांकडून ७७ हजार ५३ टन तूर खरेदी करण्यात आली आहे.
राज्यात नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून ७५५० रुपये हमीभावाने तुरीची खरेदी चालू आहे. सध्या बाजारात तुरीचे बाजार भाव कमी असल्याने हमीभावाचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. यामुळे उर्वरित शेतकऱ्यांची तूर हमीभावाने खरेदी व्हावी, त्यासाठी तूर खरेदीला मुदतवाढ मिळावी, अशी मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे.