मंगल हनवते म्हाडा सोडतीतील अनामत रकमेत वाढ करण्याच्या निर्णयामुळे सर्वासामान्यांचे, त्यातही अल्प आणि अत्यल्प गटाचे स्वप्न महाग होणार होते. पण आता मात्र म्हाडाने या गटाला दिलासा दिला आहे. अल्प आणि अत्यल्प गटाच्या अनामत रकमेत कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय म्हाडा प्राधिकरणाने घेतला आहे. मात्र त्याच वेळी मध्यम आणि उच्च उत्पन्न गटाची अनामत रक्कम मात्र वाढणार आहे. हेही वाचा >>>मुंबई: रेल्वे पोलिसच बनले अंमलीपदार्थांचे तस्कर; कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यातील पोलिसांनीच केली चरसची विक्री म्हाडाच्या घरासाठी अर्ज करताना निश्चित केलेली अनामत रक्कम भरणे अर्जदाराला बंधनकारक आहे. उत्पन्न गटाप्रमाणे ही रक्कम निश्चित करण्यात येते. मुंबई मंडळाच्या २०१९ मधील २१७ घरांच्या सोडतीत अल्प गटातील घरांकरिता २० हजार रुपये, तर मध्यम गटातील घरांकरिता ३० हजार रुपये अनामत रक्कम आकारली होती. तर २०१८ मधील १,३८४ घरांच्या सोडतीसाठी अत्यल्प गटाकरिता १५ हजार रुपये, अल्प गटासाठी २५ हजार रुपये, मध्यम गटाकरिता ५० हजार रुपये आणि उच्च गटासाठी ७५ हजार रुपये अशी अनामत रक्कम आकारली होती. आता या रकमेत वाढ करण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. म्हाडाच्या सोडतीच्या संपूर्ण प्रक्रियेत बदल करण्यात येत असून त्याअतंर्गतच अनामत रक्कम वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हेही वाचा >>>ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी युती करणार? प्रकाश आंबेडकरांचा मोठा खुलासा, म्हणाले “काही घटक…” मुंबई आणि ठाण्यातील घरांसाठी मोठ्या संख्येने अर्ज सादर होत आहेत. स्पर्धा वाढत आहे. अशा वेळी गरजू इच्छुक घरापासून दूर राहत आहेत. त्यामुळे खरे गरजू सोडतीत सहभागी व्हावेत यासाठी अनामत रक्कम वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंबंधीचे वृत्त सर्वप्रथम ‘लोकसत्ता’ने प्रसिद्ध केले होते. ही रक्कम वाढल्यास अल्प आणि अत्यल्प गटाला त्याचा मोठा फटका बसेल असा मुद्दा उपस्थित करून म्हाडाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करण्यात आली. या पार्श्वभूमीवर अखेर आता म्हाडाने अल्प आणि अत्यल्प गटाला यातून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन गटांच्या अनामत रकमेत कोणतीही वाढ केली जाणार नाही, अशी माहिती मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दिली. या दोन गटासाठी अनामत रक्कम वाढणार नसली, तरी मध्यम आणि उच्च गटाच्या रकमेत मात्र वाढ होणार आहे. ही वाढ नेमकी किती असेल हे लवकरच जाहीर करण्यात येण्याची शक्यता आहे. दरम्यान, ही रक्कम घराच्या एकूण रक्कमेच्या एक टक्का वा त्यापेक्षा अधिक असेल अशी चर्चा आहे. हेही वाचा >>>ठाकरे गट-वंचित युतीच्या चर्चेत CM शिंदेंकडून प्रकाश आंबेडकरांची भेट; पहिली प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री म्हणाले… अल्प आणि अत्यल्प गटाला परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करून देणे हेच म्हाडाचे मुख्य उद्दीष्ट्य आहे. सोडतीतील या गटामधील घरांसाठीच सर्वाधिक अर्ज येतात. खरा इच्छुक आणि गरजू हाच गट आहे. त्यामुळे या गटाची अनामत रक्कम वाढवू नये, अशी मागणी करण्यात येत होती. ही मागणी विचारात घेऊन अखेर म्हाडाने या गटाला दिलासा दिला.