एक तासामध्ये मुंबईतला वीज पुरवठा सुरळीत होईल असं ट्विट उर्जामंत्री नितीन राऊत यांनी केलं आहे. ज्या कारणामुळे तांत्रिक बिघाड झाला त्या कारणाची चौकशी होईल असंही त्यांनी म्हटलं आहे. महापरेषणच्या कळवा-पडघा जीआयएस केंद्रात अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने ठाणे, कल्याण, पालघर व नवी मुंबई मधील वीज पुरवठा खंडीत झाला. याच्या cascading effect मुळे मुंबई आणि व उपनगरांमधली वीजही खंडीत झाली आहे. महापरेषण कंपनीचे अधिकारी वीज पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी युद्धपातळीवर काम करत आहेत असंही नितीन राऊत यांनी सांगितलं. एका तासात वीज पूर्ववत सुरू होईल . वीज पुरवठा सुरळीत झाल्यानंतर ज्या कारणामुळे तांत्रिक बिघाड झाला त्याची चौकशी करण्यात येईल. — Dr. Nitin Raut (@NitinRaut_INC) October 12, 2020 मुंबईमध्ये आज (सोमवार, १२ ऑक्टोबर २०२०) सकाळी सव्वा दहाच्या सुमारास अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. पॉवर ग्रीड फेल्युअरमुळे एकाच वेळी मुंबईतील अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्याचे वृत्त आहे. बेस्टने यासंदर्भातील माहिती ट्विटरवरुन दिली असून टाटाकडून येणाऱ्या विद्युत पुरवठ्यात बिघाड झाल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाल्याचे बेस्टने म्हटलं. मुंबईमध्ये वीजपुरवठा करणाऱ्या महावितरण, अदानी, बेस्ट, टाटा अशा सर्वच वीज वितरकांच्या सेवेला या ग्रीड फेल्युअरचा फटका बसला. मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या कळवा-पडघा आणि खारघर उपकेंद्रांमधील वीज वाहिन्यांमध्ये आणि ट्रान्फॉरमर्समध्ये अनेक ठिकाणी ट्रीपिंग झालं. मुंबई आणि उपनगरांना होणाऱ्या वीजपुरवठ्यापैकी ३६० मेगावॅट पुरवठ्याला याचा फटका बसला. हा तांत्रिक बिघाड दूर करुन वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आलं. मात्र यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. अशात तासाभरात वीज पुरवठा सुरळीत होईल असं आश्वासन नितीन राऊत यांनी दिलं आहे.