मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी याकुब मेमनच्या कबरीचं कोविड काळात सुशोभीकरण करण्यात आल्याचं समोर आलं आहे. यावरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. तर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारत कबरीवरील एलईडी लाईट्स काढून टाकल्या. तर भाजपा नेत्यांकडून या मुद्य्यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाकरे सरकारवर टीका केली जात आहे. यावर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी भाजपाला प्रत्युत्तर दिलं आहे.

अरविंद सावंत म्हणाले, “खरंतर २०१५ मध्ये याकुबला तत्कालीन तथाकथित हिंदुत्ववादी सरकारने फाशी दिली. तेव्हा राज्यात देखील सरकार कोणाचं होतं, हे आपल्याला माहीत आहे. यानंतर मधल्या काळात अशी माहिती उपलब्ध आहे की, कुणीतरी त्या कब्रस्तानातील जागा विकत घेण्याचा प्रयत्न केला. कोणी ती जागा विकत घेऊन त्याचं उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला, त्याला पोलिसांनी अटक केली. ही पण माहिती आमच्याकडे आहे आणि ती माहिती तपासून पाहा. मग त्यानंतर आता जे अचानकपणे सुरू झालं आहे, दुर्दैव आहे की जेव्हा ओसामा बिन लादेनला जेव्हा अमेरिकेने त्याच्या घरात घुसून मारलं आणि त्याचं उदात्तीकरण कोणी करू नये, त्याचं थडगं कोणी बांधू नये. म्हणून त्याच्या गळ्यात दगड बांधून त्याला समुद्रात टाकलं. मग हे जे हिंदुत्ववादी सरकार केंद्रात बसलेलं होतं आणि राज्यातही त्यांचे नेते देवेंद्र फडणवीस होते, त्यांनी का त्या मृतदेहाची विल्हेवाट लावली नाही? का तो मृतदेह परत दिला गेला? याचं उत्तर त्यांनी अगोदर दिलं पाहिजे.”

याकूब मेमन कबर सुशोभिकरणावरून आदित्य ठाकरेंचा भाजपालाच प्रतिप्रश्न; म्हणाले, “तेव्हाच एका अतिरेक्याला…!”

याशिवाय, “सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे बडा कब्रस्तान ही खासगी जागा आहे. त्या खासगी जागेत काय घडतंय, याबाबत राज्य सरकार निर्णय घेत नाही. पण तरी उठसुठ ठाकरे सरकारकडे बोट दाखवलं जातं. देशात इतके महत्त्वाचे प्रश्न आहेत. महागाई, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार, शेतकरी प्रश्न, गॅस सिलिंडरचे वाढलेले दर इत्यादी सगळ्यांवरून लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी सातत्याने असा अश्लाघ्य प्रयत्न भाजपाकडून केला जात आहे.” असा आरोपही अरविंद सावंत यांनी केला.

कसाबचा मृतदेह दिला होता का? –

“याकुबचं उदात्तीकरण शिवसेना कशी करणार? उलट आम्ही मागणी करतोय चौकशी करा आणि जी कारवाई करायची ती करा. पण उगाच शेपटं आपटत बसायचं नाही. आम्हाला एकच सांगायंच आहे, शिवसेना, उद्धव ठाकरे आणि ठाकरे सरकार यांचा दुरान्वये या सगळ्या गोष्टींशी संबंध नाही. उलट तुमचं सरकार तेव्हा होतं, तर त्याची अगोदर उत्तरं द्या. तुम्ही मृतदेह का दिला? कसाबचा मृतदेह दिला होता का? या सगळ्याचा विचार करता, मला वाटतं ज्या पद्धतीने शिवसेनेला झोडपण्याचा प्रयत्न केला जातोय, त्याची मी निंदा करतो आणि चौकशीची देखील मागणी करतो.” असं देखील यावेळी सावंत यांनी स्पष्ट केलं.