मुंबई : अकरावीच्या तिसऱ्या विशेष फेरीची प्रवेश प्रक्रिया सोमवारपासून (१९ सप्टेंबर) सुरू होत असून अर्ज भरण्यासाठी मंगळवारी रात्री १० वाजेपर्यंत मुदत आहे. ही प्रवेशाची शेवटची संधी असून यंदा प्रथम येणाऱ्यास प्राधान्य फेरी होणार नाही, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले.

अकरावीच्या तीन नियमित आणि दोन विशेष फेऱ्यांनंतरही अकरावीच्या प्रवेशासाठी अर्ज केलेल्या अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही. आता केंद्रीय प्रवेश समितीने तिसऱ्या विशेष फेरीचे आयोजन केले असून सोमवारपासून प्रवेश अर्ज उपलब्ध होणार आहेत. आतापर्यंत कुठेही प्रवेश न घेतलेले, अर्ज न केलेले, प्रवेश रद्द केलेले, एटीकेटी मिळालेले विद्यार्थी या फेरीत सहभागी होऊ शकतील.

अर्ज भरण्यासाठी उद्यापर्यंत मुदत

अर्ज भरण्यासाठी मंगळवारी (२० सप्टेंबर) रात्री १० वाजेपर्यंत मुदत असेल. अर्ज भरल्यानंतर ते निश्चित करण्यासाठी गुरुवारी (२१ सप्टेंबर) सायंकाळी ६ वाजेपर्यंत अर्ज प्रमाणित करण्यासाठी तर, रात्री १० वाजेपर्यंत अर्जाचा दुसरा भाग म्हणजेच पसंतीक्रमाचा भाग अंतिम करण्यासाठी मुदत असेल. या फेरीची प्रवेश यादी शुक्रवारी (२३ सप्टेंबर) सकाळी १० वाजता जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर शनिवारी (२४ सप्टेंबर) सायंकाळी ६ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांनी मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश निश्चित करायचा आहे.