मुंबई : गुन्हा मागे घेण्यासाठी ३६ वर्षीय व्यक्तीचे मुंबईतून अपहरण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या व्यक्तीचे अपहरण करून त्याला वसईत गंभीर मारहाण करण्यात आली. त्यावेळी आरोपींनी त्यांच्या कुटुंंबियांनाकडून पाच लाख रुपये खंडणीचीही मागणी केली. तसेच अपहरणकर्त्यांनी त्याच्या पत्नीकडून दीड लाख रुपये स्वीकारण्याचा प्रयत्न केला. यावेळी रक्कम घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीला दहिसर पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी आणखी आठ आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध सुरू आहे.
बोरिवलीतून अपहरण
तक्रारदार नागेश पडवळ (नाव बदलले आहे) हे मिरा रोड येथील रहिवासी आहेत. त्यांचे बोरिवली येथील पश्चिम द्रुतगती मार्गावर राष्ट्रीय मेट्रो स्थानकाजवळून गुरूवारी अपहरण करण्यात आले होते. त्यांना मोटरगाडीत जबरदस्तीने बसवून वसईतील सीतावली गावी नेण्यात आले. तेथे पडवळ यांना गंभीर मारहाण करण्यात आली. त्यात त्यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली. आरोपींनी त्याच्याविरोधात दाखल गुन्हा मागे घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला. तसेच त्यांच्याकडे पाच लाख रुपये खंडणीचीही मागणी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
सुटकेसाठी पाच लाखांची मागणी
दुसरीकडे तक्रारदार बेपत्ता झाल्यामुळे त्यांच्या घरी इतर नातेवाईकही जमा झाले होते. तेवढ्यात तक्रारदाराच्या पत्नीला अपहरणकर्त्यांकडून दूरध्वनी आला. त्यांनी पाच लाख रुपये खंडणीची मागणी केली. त्यावेळी पत्नीने एवढी रक्कम तात्काळ देणे शक्य नसल्याचे सांगितले. त्यानंतर काही वेळाने अपहरणकर्त्यांचा पुन्हा दूरध्वनी आला. त्यावेळी पडवळ यांच्या पत्नीने एक लाख ४० हजार रुपये देऊ शकते, असे सांगितले. आरोेपींनी ती रक्कम घेऊन पडवळ यांच्या पत्नीला बोलावले. त्यापूर्वी पडवळ यांच्या पत्नीने याबाबतची माहिती पोलिसांकडे दिली होती. पोलिसांच्या पथकाने सापळा रचला व रक्कम स्वीकारण्यासाठी आलेल्या आनंद संजय पासवान (१९) याला अटक केली. तो वसईतील आचोळे गाव येथील रहिवासी आहे. त्यानंतर आरोपींच्या तावडीतून पडवळ यांची सुटका करण्यात आली.
नातेवाईकाकडूनच अपहरण
पडवळ व त्यांच्या मामामध्ये वाद सुरू आहे. त्यातून त्यांनी एकमेकांविरोधात पोलिसांमध्ये तक्रार केली आहे. पडवळ यांच्या तक्रारीवरून त्याचे दोन मामा व मामे भावाविरोधात गुन्हा दाखल आहे. तो मागे घेण्यासाठी पडवळ यांचे अपहरण करून त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला. याप्रकरणी पडवळ यांच्या तक्रारीवरून त्यांचे दोन मामा, मावस भाऊ व अपहरणात सहभागी आणखी चार जणांविरोधात दहिसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर आरोपींनी पलायन केले असून त्यांचा शोध सुरू आहे.