मुंबई : पूर्व द्रुतगती मार्गावरील जुन्या जोगेश्वरी-विक्रोळी जोडरस्त्यावरील (जेव्हीएलआर) उड्डाणपुलाच्या दुरुस्तीच्या कामाचा फटका सलग तिसऱ्या दिवशीही वाहनचालक, प्रवाशांना बसला. दुरुस्तीसाठी हा उड्डाणपूल पूर्णत: बंद असल्याने उड्डाणपुलाच्या खालून वाहतूक सुरू होती. परिणामी, विक्रोळी ते घाटकोपरदरम्यान वाहतूक कोंडी होत आहे. विक्रोळी ते घाटकोपरदम्यान शनिवारी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. रविवारीही अशीच परिस्थिती होती आणि सोमवारीही वाहनचालक, प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएमआरडीसी) दोन किमीच्या उड्डाणपुलाचे २०० बेअिरग बदलण्याचे काम गेल्या तीन महिन्यांपासून सुरू आहे. १३ मेपासून बदलण्यात आलेल्या १४८ दोन स्पॅनमधील सांधे बदलण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून यासाठी वाहतूक पोलिसांच्या परवानगीनुसार १३ ते २४ मेपर्यंत उड्डाणपूल वाहतुकीसाठी पूर्णत: बंद ठेवण्यात आला आहे. हा पूल बंद राहणार असल्याने वाहतूक इतर मार्गाने वळविणे वा इतर काही उपाययोजना करणे आवश्यक होते. मात्र, वाहतूक वळविण्यात न आल्याने शनिवारी घाटकोपर ते विक्रोळीदरम्यान प्रचंड वाहतूक कोंडी झाली. त्यानंतर मात्र वाहतूक पोलिसांनी सोमवारी कांजूरगाव, टागोरनगर येथील मनसुखलाल नाका येथून वाहतूक वळविण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी काही अंशी कमी झाल्याचा दावा वाहतूक पोलिसांनी केला आहे. सोमवारी सुट्टीचा दिवस असल्याने रस्त्यावर वाहनांची संख्या कमी होती. मात्र मंगळवारी कार्यालये सुरू असल्याने पूर्व द्रुतगती मार्गावर कोंडी होण्याची शक्यता वाहतूक पोलिसांनी व्यक्त केली. जुन्या जेव्हीएलआरवरील वाहतूक कोंडी इतरत्र वळविण्यासाठी इतर कोणताही पर्याय नाही. असे असतानाही ठाण्याच्या दिशेनी जाणारी वाहतूक काही अंशी कांजूरगाव, टागोरनगरमधून वळविण्यात आली आहे. मात्र वाहनचालक, प्रवासी द्रुतगती मार्गावरूनच जाण्यास प्राधान्य देत असल्याने येथे वाहतूक कोंडी कायम आहे. सोमवारी वाहतूक कोंडी कायम असली तरी शनिवारच्या तुलनेत परिस्थितीच काहीशी सुधारणा झाली आहे. वाहतूक नियंत्रित करण्यासाठी मनुष्यबळ वाढविण्यात आले आहे. - हुसन जाटकर, वाहतूक पोलीस अधिकारी