मुंबई : भारत सरकारतर्फे जागतिक क्षयरोग दिनानिमित्त ‘क्षयरोग मुक्त भारत अभियान – १०० दिवसांची मोहीम’ २४ मार्चपासून देशभरात राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्रातही या मोहिमेची व्यापक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. ही मोहीम राज्यातील सर्व जिल्हे व शहरी भागांमध्ये राबविण्यात येईल.
‘क्षयरोग मुक्त भारत अभियान – १०० दिवसांची तीव्र मोहीम’ या मोहिमेअंतर्गत ए.आय आधारित व्हलनरेबिलिटी मॅपिंगद्वारे निवडण्यात आलेल्या ११ हजार ९१ जोखीमग्रस्त गावे व शहरी वॉर्डमध्ये विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. पारंपरिक लक्षणांवर आधारित तपासणीऐवजी जोखीमग्रस्त लोकसंख्येची सक्रिय तपासणी करण्यावर भर देण्यात आला आहे.
निक्षय पोर्टलवरील ए.आय विश्लेषणाच्या आधारे सूक्ष्म नियोजन व रूट मॅपिंग करण्यात आले असून, वृद्ध, मधुमेही, कुपोषित, पीएचएचआयव्ही, क्षयरुग्णांचे संपर्क, स्थलांतरित व झोपडपट्टीतील नागरिकांची १०० टक्के तपासणी सुनिश्चित केली जाणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित हाताने वापरता येणारे क्ष-किरण यंत्राद्वारे जलद तपासणी करून संशयित रुग्णांना तत्काळ नॅट चाचणीसाठी पाठविण्यात येणार आहे. दुर्गम व आदिवासी भागांमध्ये निक्षय मोबाईल युनिटद्वारे सेवा पोहोचविण्यात येतील.
या मोहिमेत आयुष्यमान आरोग्य शिबिरांद्वारे क्षयरोगासोबतच मधुमेह, उच्च रक्तदाब, ॲनिमिया व कुपोषण यांसारख्या आजारांची एकत्रित तपासणी करण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर विविध विभागांचा समन्वय साधत रुग्णांना सेवा दिली जाणार आहे.
लोकप्रतिनिधी, स्वयंसहाय्यता गट, माय भारत स्वयंसेवक, स्वयंसेवी संस्था व शैक्षणिक संस्थांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्यात येणार असून, निक्षय मित्र उपक्रमाद्वारे रुग्णांना पोषण व मानसिक आधार दिला जाणार आहे. या १०० दिवसांच्या कालावधीत प्रत्येक उच्च-जोखीम क्षेत्रात आयुष्मान आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात येणार असून, राज्य, जिल्हा व तालुका स्तरावर अभियानाचा शुभारंभ करण्यात आला आहे.
निक्षय पोर्टलद्वारे रिअल-टाइम संनियंत्रण
दिवसनिहाय व गावनिहाय सूक्ष्म नियोजन तयार करण्यात आले आहे. संपूर्ण मोहिमेचे रिअल-टाइम संनियंत्रण निक्षय पोर्टलद्वारे करण्यात येणार असून, जिल्हा व राज्य स्तरावर नियमित आढावा घेतला जाणार आहे. या मोहिमेमुळे क्षयरुग्णांचा लवकर शोध, वेळेत उपचार, उपचारातील सातत्य आणि मृत्यूदरात घट साध्य होण्यास मदत होणार आहे. राज्यात क्षयरोग निर्मूलनाच्या दिशेने ही मोहीम एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असल्याचा विश्वास आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे.
