बनावट रिक्षा क्रमांकाचा वापर करून दोन रिक्षाचालकांसह सरकारचा महसूल बुडवून फसवणूक करणाऱ्या दोन रिक्षाचालकांना कस्तुरबा मार्ग पोलिसांनी नुकतीच अटक केली. त्यांच्याकडून एकाच क्रमाकांच्या दोन रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. रवी ऊर्फ कल्लू पापा खारवा आणि अब्दुल रेहमान शेख अशी या दोघांची नावे आहेत. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. हेही वाचा- मुंबई: जानेवारीमध्ये होणारी जेईई मुख्य परीक्षा पुढे ढकला; मागणीसाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका मुलुंड आणि गोवंडीतील शिवाजी नगर परिसरात वास्तव्यास असलेले रिक्षाचालक अनुक्रमे मोहम्मद गौस कादर आणि राहुल हंबीर रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. या दोघांची स्वत:ची रिक्षा आहे. मोहम्मद गोवंडीमध्ये, तर राहुल मुलुंड, भांडूप आणि पवई परिसरात रिक्षा चालवतात. तीन महिन्यांपूर्वी राहुलला वाहतूक विभागाकडून दोन हजार रुपयांच्या दंडाचा एक संदेश आला होता. त्याची रिक्षा मालाड येथे असताना त्याने वाहतुकीच्या नियमाचे उंल्लंघन करण्यात आल्याचे संदेशात म्हटले होते. त्यामुळे त्याच्याविरूद्ध दंडाचे चलन बजावण्यात आले होते. मात्र संदेशात नमुद तारखेला (१३ सप्टेंबर रोजी) तो मालाडला रिक्षा घेऊन गेलाच नव्हता. त्यामुळे या संदेशाबाबत त्याने मुलुंड वाहतूक विभागात जाऊन लेखी तक्रार केली. हेही वाचा- मुंबईत गुरुवारनंतर पुन्हा हुडहुडी; नववर्षात किमान तापमान १४ अंशावर येण्याची शक्यता कस्तुरबा मार्ग पोलिसांना २४ डिसेंबर रोजी बोरिवलीतील राजेंद्रनगर, करिअप्पा पुलाजवळ दोन रिक्षा संशयास्पदरित्या उभ्या असल्याचे निदर्शनास आले. या रिक्षाच्या मालकाचा शोध घेतल्यानंतर त्या राहुल हंबीर आणि मोहम्मद गौस कादर यांच्या असल्याचे समजले. या दोघांशी संपर्क साधला असता या रिक्षांचा क्रमांक आपल्या रिक्षाच्या क्रमांकाशी जुळत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी या रिक्षाचे मालक रवी खारवा आणि अब्दुल शेख यांचा शोध घेऊन त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनीच राहुल आणि मोहम्मद गौस यांच्या रिक्षाच्या क्रमांकाचा गैरवापर करून त्यांच्यासह सरकारची फसवणूक केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत आहेत. ते दोघेही मालाडच्या मालवणी परिसरातील अंबुजवाडी आणि गेट क्रमांक आठ येथे वास्तव्याला असल्याचे चौकशीत उघड झाले. अशा प्रकारे मुंबईत रिक्षा चालविण्यात येत आहेत का याचा शोध पोलीस घेत आहेत.