मुंबई : बहुमत चाचणीसाठी शिवसेनेचे बंडखोर आमदार मुंबईत दाखल होणार असून त्यांच्या सुरक्षेसाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) जवान त्यांच्या तैनात करण्यात येणार आहेत. सुमारे दोन हजार सीआरपीएफचे जवान आमदारांच्या सुरक्षेसाठी असतील , असे सूत्रांनी सांगितले.

शिवसेनेतील बंडखोर आमदारांमुळे राज्यातील परिस्थिती अस्थिर झाली आहे. मुंबईसह राज्यातील आमदार एकनाथ शिंदे यांच्यासह गुवाहाटी येथून मुंबईत दाखल होणार आहेत. बंडखोर आमदार मुंबईत आल्यानंतर त्यांना सुरक्षा पुरवण्यासाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाचा वापर करण्यात येणार असल्याचे समजते आहे. याशिवाय राज्य पोलिसांनाही त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात राहण्यास सांगण्यात आले आहे.

राज्यातील अनेक नेत्यांच्या मागे सध्या सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) चौकशीचा ससेमिरा लागला आहे. मंत्री आणि नेत्यांची चौकशी, अटक यासाठीही केंद्रीय राखीव पोलीस दलाचा वापर करण्यात येतो. अमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या कारवाया, आयकर विभागाच्या कारवायांदरम्यानही केंद्रीय राखीव पोलिसांची मदत घेण्यात येते. त्यामुळे सद्यस्थितीत राज्याच्या पोलिसांना दूर ठेवून केंद्रीय यंत्रणांची मदत घेण्यात येऊ शकते, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.