वरळीत गणपतराव कदम मार्गावरील मरियम मेन्शन चाळीत दोन दिवसांपूर्वी लागलेल्या आगीत भाजलेल्या दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. एका पन्नास वर्षीय महिलेचा मृत्यू मंगळवारी सकाळी झाला तर ३८ वर्षीय मुलीचा मृत्यू बुधवारी संध्याकाळी नायर रुग्णालयात झाला.

वरळीतील गणपतराव कदम मार्गावरील ए टू झेड इंडस्ट्री जवळ असलेल्या एका चाळीत ८ ऑगस्टला आग लागली होती. दुसऱ्या मजल्यावरील एका खोलीतील वातानुकूलित यंत्रामध्ये ही आग लागली होती. या आगीत एकाच कुटुंबातील चार जण जखमी झाले होते. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यापैकी लक्ष्मी तेजा राठोड या ५० वर्षीय महिलेचा मृत्यू गुरुवारी सकाळी झाला. तर मधु तेजा राठोड या ३८ महिलेचा मृत्यू बुधवारी संध्याकाळी झाला. तर धीरज राठोड (४१ वर्षे) आणि तेजा राठोड (७१ वर्षे) हे कस्तुरबा रुग्णालयात दाखल असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.