उबर आणि ओला या दोन कॅब कंपन्या सध्याच्या घडीला खासगी प्रायव्हेट टॅक्सी सर्व्हिस देणाऱ्या आघाडीच्या कंपन्या आहेत. या कंपन्यांपैकी उबर या कंपनीने त्यांचं मुंबईतलं ऑफिस बंद केलं आहे. त्याचं मुख्य कारण आहे करोना आणि त्यामुळे जगावर ओढवलेलं आर्थिक संकट. लॉकडाउनमुळे अनेक कंपन्यांची आर्थिक घडी विस्कटली आहे. त्यात आता उबरचाही समावेश झाला आहे. मात्र मुंबईतलं ऑफिस बंद झालं असलं तरीही तुम्ही जर उबरचे ग्राहक असाल तर तुम्हाला उबरची सुविधा मिळत राहिल असंही कंपनीने स्पष्ट केलंय. मुंबईतील ऑफिस डिसेंबर महिन्यापर्यंत बंद करण्याचा निर्णय उबरने घेतला आहे.

कंपनीने ट्विट करुन याबद्दलची माहिती दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राईड हेलिंग कंपनीने जगभरातले ६७०० कर्मचारी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर उबरने महिन्याभराने हा निर्णय घेतला आहे. कंपनीने जागतिक पातळीवर घेतलेल्या निर्णयामुळे भारतातील ६०० कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागणार आहे.

सध्याच्या घडीला खासगी कॅब बुकिंगला महत्त्व आलं आहे. अनेकदा लोक आपली कार वापरण्याऐवजी थेट खासगी कॅब सेवेला प्राधान्य देतात. अशात आता उबरने मुंबईतलं ऑफिस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.