मुंबई : अयोध्येत ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद पाडली गेली, तेव्हा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह शिवसेना नेते मनोहर जोशी, अॅड. लीलाधर डाके कुठे होते, असा सवाल भाजप आमदार अॅड. आशीष शेलार यांनी शिवसेनेला केला आहे. ही बेडूक उडय़ा मारणारी शिवसेना असून आयत्या बिळावर नागोबा असा त्यांचा कार्यक्रम आहे, अशी टीका शेलार यांनी केली. बाबरी मशीद पाडण्याची घटना आणि राममंदिर आंदोलनाशी शिवसेनेचा काहीही संबंध नाही, या विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपावरून उभयपक्षी आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरूच आहे. शिवसेना संजय राऊत यांनी उपस्थित केलेल्या मुद्दय़ांवर बोलताना शेलार म्हणाले, वादग्रस्त मशिदीचा ढाचा पाडला गेला, त्यानंतर मनोहर जोशी व डाके पोचले, त्यांचे विमान कुठे भरकटले होते, ज्यावेळी राममंदिरासाठीच्या विटांचे पूजन करण्यात आले, त्यावेळी खासदार राऊत कुठे होते ? शिवसेनेने उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री कल्याणसिंह यांचा बोध घ्यावा. हिंदुत्वावरून तुमची भूमिका इतकी दळभद्री का, शिवाजी पार्कवर ईदनिमित्त नमाज पढण्यात यावा, असे म्हणणाऱ्यावर कारवाई का नाही? खासदार राऊत झेंडय़ाचा रंग बदलण्यास निघाले आहेत का?असा सवाल शेलार यांनी केला. राज्यात अघोषित आणीबाणी -दरेकर मनसेच्या आंदोलनाच्या निमित्ताने राज्यात घातपात करण्यासाठी परराज्यातून काही गुंड आल्याचा शिवसेना खासदार संजय राऊत यांचा दावा निराधार आणि बेजबाबदारपणाचा आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडविण्यासाठी अन्य राज्यांतून येणाऱ्यांवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करावी. मात्र, मनसेच्या नेत्यांना नोटिसा पाठवून आणि गुन्हे दाखल करून राज्य सरकारकडून अघोषित आणीबाणी लादण्यात आल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. राज ठाकरे यांच्याविरोधात पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा आणि मनसे नेत्यांवर होत असलेल्या कारवाईबाबत दरेकर म्हणाले, राज ठाकरे यांच्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने ठाकरे सरकारचा जळफळाट झाला आहे. त्यामुळे ही कारवाई होत आहे. आमच्याविरोधात बोललात, तर कायद्याचा वापर करून चिरडून टाकू, असे राज्य सरकार सुचवू पाहात आहे. भाजप पदाधिकाऱ्यांना नोटीस कशी? मनसे नेते व कार्यकर्त्यांना पोलिसांनी बजावलेल्या नोटिसांबाबत शेलार म्हणाले, राज्य सरकारलाच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा आहे. दोन भाजप पदाधिकाऱ्यांना नोटीस का दिली, येथे कायद्याचे राज्य आहे का, अशी विचारणाही शेलार यांनी केली.