जर तुमच्यात जर हिंमत असेल तर चोरलेलं शिवसेना हे नाव आणि चोरलेलं धनु्ष्यबाण हे घेऊन निवडणुकीच्या मैदानात या. मी मशाल घेऊन निवडणुकीच्या मैदानात येतो. मग होऊन जाऊदेत दोन हात बघुयात कोण जिंकतं असं म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान दिलं आहे. तसंच निवडणूक आयोगावर आमचा मुळीच विश्वास नाही. निवडणूक आयोगाला चुनाव आयोग म्हणतात त्याऐवजी त्यांना चुना लावणारा आयोग म्हटलं पाहिजे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. मुंबईत मराठी भाषा दिनानिमित्त एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमातल्या छोटेखानी भाषणात उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि भाजपाचा समाचार घेतला आहे. काय म्हटलं आहे उद्धव ठाकरेंनी? पूर्वी पत्रकारांच्या हाती कलम असायचं आता कमळ असतं. सगळ्यावरच आपलं वर्चस्व या यांना प्रस्थापित करायचं आहे.ज्यांचा स्वातंत्र्य लढ्याशी तीळमात्र संबंध नव्हता तेच लोक आज पुन्हा स्वातंत्र्य मारायला निघाले आहेत. ७५ वर्षांनंतर लोकशाहीला आदरांजली वाहण्याची वेळ या लोकांनी आणली आहे. शिवसेना आपल्यातून कुणीही चोरू शकत नाही. ठाकरे नाव वगळून शिवसेना चालवून दाखवा माझं आज त्यांना खुलं आव्हान आहे की ठाकरे नाव वगळून तुम्ही शिवसेना चालवून दाखवा. स्वतःच्या वडिलांचा फोटो लावून शिवसेना चालवून दाखवा माझी काही हरकत नाही. तुमच्यात काही कर्तृत्त्व असेल तर तुमच्या वडिलांचं नाव लावा आणि शिवसेना चालवून दाखवा. पण त्यांच्या वडिलांनाही वेदना होत असतील की काय दिवटं निपजलं मी. माझं काही याने घेतलेलं नाही. याला बापही दुसऱ्याचा लागतो आहे. ही सगळी तऱ्हा पाहिल्यावर लक्षात घ्या जागरुक रहावंच लागेल असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. माझं खुलं आव्हान आहे त्यांना की. उद्या निवडणुका येतील हिंमत असेल तर चला चोरलेला धनुष्यबाण आणि चोरलेलं नाव घेऊन निवडणुकीच्या मैदानात या मी माझी मशाल घेऊ मैदानात घेतो. लोकं तयारच आहेत. तुमची दखल ते वेगळ्या पद्धतीने घेतीलच. त्यासाठी तुम्ही हिंमत दाखवा आणि चोरलेला धनुष्यबाण आणि नाव घेऊन निवडणुकीच्या मैदानात या असं खुलं आव्हानही उद्धव ठाकरेंनी दिलं आहे.