मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबासह शिवसेना नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या किरीट सोमय्या यांनी यावेळी गंभीर आरोप केले आहेत. उद्धव ठाकरेंच्या पार्टरनरचे कसाबशी संबंध असल्याचा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत केला आहे. २६/११ हल्ल्यात अधिकाऱ्यांनी वापरलेले बुलेटप्रूफ जॅकेट बोगस असल्याचे म्हणत किरीट सोमय्या यांनी नवा आरोप केला आहे. “शरद पवार यांचे नवाब मलिक हे दाऊचे पार्टनर आहे तर उद्धव ठाकरे यांची कसाबशी व्यावासायिक संबधं. मी जाणीवपूर्वक सांगू शकतो की नवाब मलिक यांचे संबंध दाऊद गॅंगपर्यंत पोहचू शकतात तर उद्धव ठाकरे यांच्या पार्टनरचे संबंध कसाब पर्यंत आहेत. हेमंत करकरेंना देण्यात आलेले बुलेटप्रूफ जॅकेट हे बोगस होते त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. हे जॅकेट बिमल अग्रवाल यांनी पुरवले होते. यशवंत जाधव यांच्यावर ज्यावेळी धाड टाकण्यात आली त्यावेळी बिमल अग्रवाल यांचे नाव पुढे आले होते,” असे किरीट सोमय्या म्हणाले. “बिमलकुमार रामगोपाल अग्रवाल यांची तीन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये अटक होऊन ते सध्या जामिनावर आहेत. बिमलकुमार अग्रवाल, किशोरकुमार अग्रवाल आणि यतिन यशवंत जाधव. समर्थ इरेक्टर डेव्हलेपर्स ही बिमल अग्रवाल आणि यशवंत जाधव यांची भागीदारीमधील कंपनी आहे. या कंपनीने बद्री प्राईव्हेट लिमिटेड कंपनीकडून काही महिन्यांपूर्वी मलबार हिल येथे रि डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ८० कोटी रुपयांना विकत घेतला. यशवंत जाधव यांची कथा १ हजार कोटींपर्यंत जाणार आहे. समर्थ डेव्हलेपर्स यांचे संबंध उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्यासोबत आहेत. श्रीधर पाटणकर यांनी बुलेटप्रूफ जॅकेट घोटाळा करणाऱ्या बिमल अग्रवालकडून टीडीआर घेतला आहे,” असेही सोमय्या म्हणाले. तसेच राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ यांनी १५८ कोटींचे मनी लॉंड्रींग केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. “हसन मुश्रीफ यांनी १६ कोटी रुपये शेतकऱ्यांकडून जमा केले आहेत आणि कारखाना सुरू केला असून त्यांच्यावर कारवाई सुरू झाली आहे. अनिल परबांचंही उलटं काऊंटडाऊन सुरू झालं आहे. परबांचे दापोलीतील रिसॉर्ट पाडण्यासाठी पर्यावरण मंत्रालयाने सांगितलं होतं पण ते पाडलं नाही, त्यावर आता कोर्टाचा आदेश येईल आणि कारवाई होईल,” असं किरीट सोमय्या म्हणाले आहेत.