बेळगाव महाराष्ट्रात यावे, हा नवस करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री व आमदारांना घेऊन गुवाहाटीला का जात नाहीत, असा खोचक सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केला. सीमाप्रश्नी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आक्रमक असताना मुख्यमंत्री शिंदे यांनी मात्र मौन बाळगले असल्याने ठाकरे यांनी टीका केली आहे. ठाकरे यांनी कर्नाटक सीमाप्रश्नावरून राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. कर्नाटकने आपल्या तलावात पाणी सोडले आणि आपले राज्य सरकार सत्तेच्या पाण्यात गटांगळय़ा खात आहे. या नेभळटपणाविरोधात सर्वानी एकजुटीने उभे राहिले पाहिजे, असे आवाहन ठाकरे यांनी केले.मुख्यमंत्रीपद सोडण्याच्या अखेरच्या दिवसांमध्ये अयोध्येत महाराष्ट्र भवन करणार असल्याची घोषणा मी केली होती. त्या घोषणेला शिंदे सरकारने स्थगिती दिली असेल, तर माहीत नाही, असा टोलाही ठाकरे यांनी लगावला.