मुंबई : जून महिना संपत आला तरी पुरेसा पाऊस झाला नसल्याने राज्यभरात फक्त १३ टक्के क्षेत्रावरच पेरण्या झाल्या आहेत. या सगळय़ाचा परिणाम येत्या काही दिवसांत शेतमालाच्या तुटवडय़ात आणि दरवाढीत दिसणार असून शहरी भागांत भाज्या आता आहेत त्याहून आणखी महागण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी राज्यातील खरीप हंगामाबाबत आढावा घेण्यात आला. राज्यातील पेरणीची स्थिती समाधानकारक नसल्याची माहिती देण्यात आली. राज्यातील धरणातील एकूण पाणीसाठा कमी झाला असून सध्या जेमतेम २१.८२ टक्के इतका पाणीसाठा आहे. त्यामध्ये अमरावती विभागातील प्रकल्पात ३३.८० टक्के, मराठवाडयात २७.१० टक्के, कोकणात ३४.४३ टक्के, नागपूर विभागात २६.८१ टक्के, नाशिक विभागात २०.०२ टक्के तर पुणे विभागात सर्वात कमी १२.३५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. राज्यात सध्या ६१० गावे आणि १२६६ वाडय़ांना ४९६ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.पावसाला सुरुवात झाल्यामुळे मागील आठवडय़ाच्या तुलनेत टँकर्सची संख्येत ३१ने तर टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत २४ ने आणि वाडय़ा-वस्त्यांच्या संख्येत १३० ने घट झालेली आहे. आज जलआढावा.. कमी पावसामुळे शहरांमध्ये पाणी कपातीचे संकट ओढवू शकते. त्यामुळे बुधवारी नगर विकासमंत्री सुभाष देसाई हे सर्व पालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधून पाणी पुरवठय़ाचे नियोजन कसे केले जावे, याबाबत आढावा घेणार आहेत. पर्जन्यभान.. पुणे : पुढील तीन ते चार दिवसांमध्ये दक्षिण कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रात प्रामुख्याने घाट विभागांमध्ये काही भागांत जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मुंबई, ठाणे, पुण्यासह उत्तर महाराष्ट्रात हलक्या सरी कायम राहणार असून, विदर्भात काही ठिकाणी सोसाटय़ाच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. . सद्य:स्थिती.. राज्यातील ६१० गावे आणि १२६६ वाडय़ांना ४९६ टॅंकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. असमाधानकारक पावसामुळे धरणे आटू लागली आहेत. जेमतेम २१ टक्के पाणीसाठा उरला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत.. गेल्यावर्षी राज्यात या काळात सरासरी २७० मिलीमीटर पाऊस झाला होता. त्या तुलनेत यंदा मात्र केवळ १३४ मिमी. पाऊस झाला. पुरेसा पाऊस न पडल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. खरीपाखालील क्षेत्रापैकी केवळ १३ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत.