महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्यातील नाराज नगरसेवक वसंत मोरे यांनी सोमवारी पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. दादारमधील ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी ही भेट झाली. गुढीपाडव्यानिमित्त आयोजित केलेल्या मनसेच्या मेळाव्यामध्ये मशिदींवरील भोंग्यांसंदर्भात भूमिका घेताना राज ठाकरेंनी भोंगे उतरवले नाही तर मशिदींसमोर भोंग्यांवर हनुमान चालीसा लावू अशी भूमिका घेतलेली. या भूमिकेनंतर पुण्यातील मनसेचे शहराध्यक्ष असणाऱ्या मोरे यांनी आपण मशिदींसमोर हनुमान चालीसा वाजवणार नाही असं सांगत राज ठाकरेंच्या भूमिकेविरोधात वक्तव्य केलेलं.

नक्की पाहा हे फोटो >> Photos: …अन् वसंत मोरे राज ठाकरेंच्या पाया पडले; ‘शिवतीर्थ’वरील बैठकीमधील Inside Photos पाहिलेत का?

त्यानंतर मागील काही दिवसांपासून मोरे हे पक्षावर नाराज असल्याची, ते पक्ष सोडणार असल्याची चर्चा पुण्यातील राजकीय वर्तुळात होती. मात्र याच चर्चांना उधाण आलेले असताना वसंत मोरेंनी मुंबईमध्ये राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. मतभेद समोर आल्यानंतर राज यांच्यासोबतची ही पहिलीच भेट असल्याने ते भेटीत काय बोलणार याबद्दल सर्वांनाच उत्सुकता होती. शिवतीर्थवर राज यांनी आपल्याला पहिल्यांदा पाहिल्यानंतर तीन शब्द उच्चारल्याचं मोरे म्हणाले आहेत.

नक्की वाचा >> “संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय…” ‘१०० टक्के समाधानी’ वसंत मोरेंनी भेटीच्या फोटोला दिलेल्या कॅप्शनमुळे चर्चांना पुन्हा उधाण

वसंत मोरे हे सकाळी साडेसातच्या सुमारास आपल्या काही निवडक सहकाऱ्यांसोबत पुण्याहून मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. दुपारी १२ च्या सुमारास त्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. या भेटीदरम्यान नेमकं काय घडलं याबद्दल टीव्ही ९ मराठीशी बोलताना वसंत मोरेंनी सविस्तर माहिती दिली. “भेट झाली तेव्हा राज ठाकरेंचा पहिला शब्द काय होता? भेट झाली त्यापूर्वी तीन चार दिवस चर्चा सुरु होत्या. त्यामुळे तुम्ही राज ठाकरेंसमोर गेलात तेव्हा ते नेमकं काय म्हणाले?”, असा प्रश्न वसंत मोरेंना विचारण्यात आला.

नक्की वाचा >> ‘शिवतीर्थ’वर राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर वसंत मोरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मागील दोन-तीन दिवसांपासून…”

या प्रश्नाचं उत्तर देताना वसंत मोरे यांनी, “बोल, काय रे” असं म्हणत राज ठाकरेंनी विचारपूस केल्याचं सांगितलं. “मला नेहमी राज ठाकरेंकडून हाच शब्द हवा असतो. बोल, काय रे.. अन् या भेटीत त्यांनी हाच पहिला प्रश्न विचारला,” असं वसंत मोरे म्हणाले. तसेच पुढे बोलताना या भेटीदरम्यान तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली की असं विचारण्यात आलं असता, “माझ्या मनात प्रश्न नव्हते. ते प्रसारमाध्यमांनी निर्माण केलेले. मी राज ठाकरेंसोबतच आहे,” असं उत्तर वसंत मोरेंनी दिलं.