आपल्या कलाविष्काराच्या ताकदीवर नाटके व दूरदर्शनमालिका यांमधील अनेक भूमिका अजरामर करणारे ज्येष्ठ अभिनेते रघुवीर नेवरेकर यांचे रविवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. दि गोवा हिंदू असोशिएशनच्या नाटकांमधील अनेक भूमिकांमधून ते प्रकाशझोतात आले होते. संशोयकल्लोळ या नाटकातील ‘फाल्गुनरावां’ची भूमिका साकारत ते प्रथम रंगमंचावर आले. या भूमिकेने त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. त्यानंतर शारदा, करीन ती पूर्व या नाटकांमध्ये त्यांनी भूमिका रंगवल्या. ‘शारदा’मधील ‘भुजंगरावां’ची भूमिकाही प्रचंड गाजली. असोसिएशनच्या ‘मरणात खरोखरच जग जगते’ या नाटकाचे त्यांनी दिग्दर्शनही केले होते. काही वर्षांपूर्वी ‘दूरदर्शन’वर आलेल्या ‘श्वेतांबरा’ या मालिकेतील त्यांची भूमिका गाजली होती. ज्येष्ठ गायक रामदास कामत, अभिनेते मोहनदास सुखटणकर, ज्येष्ठ अभिनेत्री आशालता आदी कलावंतांबरोबर त्यांनी भूमिका साकारल्या. मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीचे अभिनेते अशोक सराफ यांचे ते मामा. प्रकृती अस्वस्थ्यामुळे आठ दिवसांपूर्वी त्यांना शुश्रुषा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवारी सकाळी १० वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. नेवरेकर यांच्या निधनामुळे मराठी रंगभूमी एका गुणी अभिनेत्याला मुकली आहे, अशी प्रतिक्रिया मोहनदास सुखटणकर यांनी व्यक्त केली. नेवरेकर यांनी बालगंर्धवांच्या गायकीशी आपली नाळ जुळवून दिली, असे ज्येष्ठ अभिनेते रामदास कामत यांनी सांगितले. अभिनय क्षेत्रातील ते आपले गुरू होते. त्यांच्यामुळेच आपल्याला रंगभूमीवरील अभिनेत्याचा वावर, अभिनयातील बारकावे अशा अनेक गोष्टी शिकता आल्या, असेही कामत म्हणाले.