मुंबई : विरार येथून १५ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मालवणी पोलिसांनी अपहरण, बलात्कार व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून २० वर्षीय तरूणाला अटक केली. आपण तुझ्या वडिलांना ओळखत असून त्यांच्याकडे जायचे आहे, असे सांगून आरोपी पीडित मुलीला मालाड येथे घेऊन गेला, असा आरोप आहे. याप्रकरणी मालवणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
पीडित मुलगी शिक्षण घेत असून ती शनिवारी घराजवळीत दुकानात जात होती. त्यावेळी आरोपी पीडित मुलीला भेटला होता. आपण तुझ्या वडिलांना ओळखत असून त्यांच्याकडे घेऊन जातो, असे त्याने पीडित मुलीला सांगितले. त्यानंतर आरोपीने पीडित मुलीला मालवणी येथील घरी आणले आणि तिच्यावर अत्याचार केला. पीडित मुलीला वेदना होऊ लागताच त्याने तिला घरी सोडतो, असे आश्वासन दिले आणि दुचाकीवरून तो तिला जंगलात घेऊन गेला.
तेथे निर्जनस्थळी आरोपीने पुन्हा मुलीवर अत्याचार केला. या प्रकरणानंतर आरोपीने पीडित मुलीला धमकावण्यास सुरुवात केली. घडलेला प्रकार कोणालाही सांगू नको, असेही त्याने तिला धमकावले. तसेच घडलेल्या प्रकाराचे मोबाइलने चित्रीकरण केले आहे. त्यामुळे घडलेल्या प्रकाराची वाच्यता केल्यास समाज माध्यमांवर व्हीडीओ अपलोड करण्याची आणि कुटुंबियांना ठार मारण्याची धमकी त्याने दिली.
पीडित मुलीने याप्रकरणी मालवणी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी अपहरण, बलात्कार व पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून रविवारी आरोपीला अटक केली. आरोपीसोबत आपली ओळख नसल्याचा दावा पीडित मुलीने केला आहे. आरोपीने वडिलांचा मित्र असून वडिलांकडे सोडण्याचे आश्वासन देऊन आपल्याला मालाड परिसरात आणल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
अल्पवयीन मुलांविरोधात घडलेल्या गुन्ह्यांमध्ये वाढ
मुंबईत अल्पवयीन मुले व मुली यांच्याविरोधात घडलेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. मुंबईत २०२४ मध्ये बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायद्याअंतर्गत १३४१ गुन्ह्यांची नोंद झाली होती. पोक्सो कायद्याअंतर्गत २०२३ मध्ये ११०८ गुन्ह्यांची नोंद झाली होती. मुंबईत २०२४ मध्ये पोक्सो कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये ६०९ बलात्कार, ६६७ विनयभंग व ३५ छेडछाड-अश्लील शेरेबाजी केल्याच्या घटनांचा समावेश आहे.
अल्पवयीन मुलींवरील गुन्ह्यांतील ९९ टक्के गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना २०२३ मध्ये यश आले होते. गुन्ह्यांची उकल करण्याच्या प्रमाणात २०२४ मध्ये घट झाली असून २०२४ मध्ये हे प्रमाण ९६ टक्के होते. याशिवाय विनयभंग व छेडछाड-अश्लील शेरेबाजी या गुन्ह्यांची उकल होण्याचे प्रमाणही अनुक्रमे १०० टक्क्यांवरून ९७ टक्के व ९६ टक्क्यांवरून ९१ टक्क्यांपर्यंत घटले आहे. अल्पवयीन मुलांविरोधातील अत्याचाराच्या घटनांमध्ये बहुसंख्य आरोपी परिचित व्यक्ती आहेत.