गोवंडी स्थानकाबाहेरील ६४ एकर भूखंडाच्या जागेवर आशियातील सर्वात मोठे पशूवधगृह १९७१ साली उभारण्यात आले. गेली अनेक वष्रे या जागेत मेंढय़ा, बकरी, म्हशी आणि २०१५पर्यंत बल यांच्या खरेदी-विक्रीचा बाजार सुरू आहे. हा बाजार सर्वसामान्यांच्या ‘बाजार’ संकल्पनेपेक्षा खूपच वेगळा आहे. ‘खरेदी-विक्री’ हा बाजाराचा स्थायी भाव असला तरी पशूवधगृहातील बाजार हा अनुज्ञाप्तीकरांसाठी आरक्षित ठेवण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई अगदीच परदेशात जाणारे शेळ्या, मेंढय़ांचे मास या बाजारातूनच निर्यात केले जाते. या देवनार बाजाराची एक सफर.. तेलाचा तवंग आलेला मटणखिमा, खुसखुशीत तळलेले मटण कटलेट हे आठवले तरी मांसाहारप्रेमींच्या तोंडाला पाणी सुटते. दुकानातून काळ्या रंगाच्या प्लास्टिकच्या पिशवीतून आणलेल्या मटणावर संस्कार करून त्यापासून विविध पदार्थ बनविले जातात. हे मटण देवनारमधील पशूवधगृहातील जनावरांच्या बाजारातून येते. विक्रेता, दलाल आणि ‘गवाल’ (प्राण्यांचा सांभाळ करणारी जमात) यांच्यामध्ये हा बाजार चालतो. राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश तसेच सातारा, सांगली, जळगांव येथील आठवडी बाजारात विकलेल्या शेळ्या, मेंढय़ा आणि म्हशी देवनारमध्ये आणून विकल्या जातात. दर आठवडय़ाच्या मंगळवारी व शनिवार शेळ्या-मेंढय़ांचा मोठा बाजार भरतो. तर सोमवार व शुक्रवारी येथे म्हशींचा बाजार भरतो. येथे दररोज २०० ते २५० डुकरांना मारण्यात येते. या बाजारात फिरताना अनेकदा तुमचे मन विचलित होते. शेळ्या, मेंढय़ा, म्हशी या जनावरांना मोठ मोठय़ा ट्रक किंवा टेम्पोत भरून बाजारात आणले जाते. येथील पशूवधगृहात आणल्यावर प्रथम पशूवैद्यक अधिकाऱ्यांकडून त्यांची पूर्ववध तपासणी होते. त्यानंतर त्यांना १९ एकर जागेत उभारण्यात आलेल्या निवारावाडय़ात आणले जाते. बाजार भरतो त्या वाडय़ाच्या प्रवेश द्वाराजवळच अनेक सुरक्षा रक्षक उभे असतात. उजव्या बाजूला एका छोटय़ा फळ्यावर किती जनावरे आली, किती शिल्लक यांची माहिती लिहिलेली असते. या बाजारात प्रवेश केल्यावर शेळ्या-मेंढय़ा समूहाने उभ्या असलेल्या दिसतात. रस्त्याच्या दुतर्फा मोठय़ा जागेत या जनावरांना जमा केले जाते. याच ठिकाणी त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची सोयही केलेली असते. या जनावरांना घेऊन आलेले मालक त्यांना समूहात बांधून ठेवतात. जनावरे हरवून जाऊ नये यासाठी त्यांच्या अंगावर पिवळा, हिरवा, गुलाबी रंग दिला जातो. यामुळे एखादे जनावर दुसऱ्या गटात गेले तरी त्यांना शोधणे अवघड जात नाही. या जनावरांचा वध करण्यापासून त्यांना सांभाळण्यासाठी येथे मोठी यंत्रणा उभारण्यात आली आहे. आलेल्या जनावरांना सांभाळणे, त्यांना चारा-पाणी घालणे यासाठी येथे ८० ते १०० ‘गवाल’ समाजातील लोक काम करतात. या गवालांतर्गत ५ धनगरही असतात. भटक्या-विमुक्तांमधील धनगर समाज पिढय़ान् पिढय़ा शेळ्या-मेंढय़ा सांभाळण्याचा व्यवसाय करीत आहे. या बाजारातही जनावरांचा सांभाळ करण्यासाठी ४०० ते ५०० धनगरांचा समावेश आहे. यातील बहुतांश लोक देवनार भागातच वास्तव्य करीत आहेत. विक्रेत्यांकडून या धनगरांना मानधन दिले जाते. बाजारात खरेदीदार येऊन दलालांकरवी जनावरांची खरेदी करतो. हे खरेदीदार मुंंबई आणि उपनगरातील मटनाच्या दुकानाचे मालक असतात. हे मालक आपल्याला आवश्यक तेवढी जनावरे येथून विकत घेतात. जनावरांची खरेदी झाल्यावर या जनावरांना पशूवधगृहात नेले जाते. जनावरांची कातडी व पोटातील घाण काढून स्वच्छ केले जाते. यासाठी साधारण अर्धा किलोमीटर जागेत यंत्रणा उभारण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात जनावराची मान कापली जाते व पुढे या जनावराच्या शवाला उलटे लटकवून त्याची कातडी काढणे, पोटातील घाण काढणे ही कामे केली जातात. सर्व झाल्यानंतर जनावरांची वधोत्तर तपासणी केली जाते. यासाठी ३० ते ३५ पशूवैद्यक अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. तेथून ही जनावरे मटनांच्या दुकांनामध्ये पाठविली जातात. परदेशात पाठवायचे असल्यास या पशूवधगृहात उभारण्यात आलेल्या शीतखोल्यांमध्ये जनावरांचे शव ठेवले जाते आणि मागणीनुसार पाठविले जाते. येथे होणारी खरेदी-विक्री ही वजनावरच होते. बाजारात ४५० रुपये किलो मटणाचा भाव असेल तर येथे एका किलोमागे ५२० ते ५५० रुपये आकारले जातात. देशात पूर्वीच्या काळात मेंढी व कुक्कुट पालन हा व्यवसाय दुय्यम मानला जात होता. आता ग्रामीण भागात पशू व्यवसायावर भर दिला जात आहे. येत्या वर्षांत आशियातील हे सर्वात मोठे पशूवधगृह कात टाकणार आहे. येथील यंत्रणा अधिक सोपी आणि सहज करण्यात येणार आहे. त्यामुळे या बाजारावर अवलंबून असलेल्या एक ते दीड हजार कामगारांना चांगल्या सोयी-सुविधा उपलब्ध होणार आहेत. पशूवधगृहाची आर्थिक उलाढाल ४ मार्च २०१५ पासून या पशुवधगृहात बलांचा वध करण्यावर र्निबध लावण्यात आले. सध्या येथे विक्रीसाठी येणाऱ्या म्हशींची संख्या १५० ते १७० पर्यंत आहे. मात्र सध्या म्हशी आणि शेळ्या-मेंढय़ांवरच हा बाजार चालतो. सध्या एका दिवसाला २५ ते ३० हजार शेळ्या, मेंढय़ा आणल्या जातात व त्यांची विक्री केली जाते. यांच्या वजनावरून किंमत ठरवली जाते. ५०० ते ५५० रुपये किलोने ही दोन्ही जनावरे विकली जातात. त्यामुळे एक जनावर साधारण ७ हजारापर्यंत जाते. यानुसार विचार केला तर जनावरांच्या खरेदी विक्रीतून दिवसाला २० ते २५ लाखांची उलाढाल होते. ही खरेदी-विक्री केवळ जिवंत जनावरांची. जनावरांचा वध केल्यानंतर त्यांचे मांस विविध मटणाच्या दुकानांपर्यंत पोहोचविले जाते. ही उलाढालाही काही लाखोंच्या घरात आहे. मीनल गांगुर्डे @MeenalGangurde8