१४ हजारांहून अधिक इमारतींमध्ये वर्गीकरण तब्बल १४ हजारांहून अधिक इमारतींमधील ओला आणि सुका कचरा वेगळा गोळा करण्याचे काम ‘प्रगत परिसर व्यवस्थापन गटां’मार्फत सुरू झाले आहे. कचरा वर्गीकरणावर भर देत पालिकेच्या विभाग स्तरावरच कचऱ्याची विल्हेवाट लावण्यावर भर देण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी शनिवारी पालिका अधिकाऱ्यांना दिले. देवनार कचराभूमीला लागलेल्या आगीनंतर मुंबईत निर्माण होणारा कचरा आणि कचराभूमींचा प्रश्न ऐरणीवर आला. मुंबईत रोज ९५०० मेट्रिक टन कचरा निर्माण होत असून हा कचरा देवनार, मुलुंड आणि कांजूर येथील कचराभूमींमध्ये टाकण्यात येतो. यापैकी देवनार आणि मुलुंड कचराभूमींची क्षमता संपुष्टात आली असून या कचराभूमी शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्याची आवश्यकता आहे. असे असतानाही तेथे कचरा टाकण्यात येत आहे. मुंबईत रोज निर्माण होणारा कचरा टाकायचा कुठे, असा प्रश्न असून पालिकेच्या प्रत्येक विभागातच त्याची विल्हेवाट लावण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले होते. तसेच सोसायटीच्या स्तरावर ओला आणि सुका कचरा वेगवेगळा गोळा करण्याची सूचना करण्यात आली होती. कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी पालिकेने आता ‘प्रगत परिसर व्यवस्थापन गटां’ची मदत घेण्यास सुरुवात केली आहे. ७,०६२ इमारतींमधील ओला आणि सुक्या कचऱ्याच्या वर्गीकरणास सुरुवात करण्यात आली आहे. त्याचबरोबर अन्य संस्थांच्या माध्यमातूनही ७,७१९ इमारतींमधील ओला आणि सुका कचरा वेगवेगळा गोळा करण्यात येऊ लागला आहे. सामाजिक संस्थांच्या मदतीने ओला आणि सुका कचरा वेगवेगळा गोळा करण्यावर अधिक भर द्यावा, असे आदेश अजय मेहता यांनी या वेळी अधिकाऱ्यांना दिले. देवनार कचराभूमीत दोन कूपनलिका सुरू देवनार कचराभूमीत अधूनमधून लागणारी आग विझविण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करण्यात येत होता. पिण्याच्या पाण्याचा हा अपव्यय टाळण्यासाठी पालिका आयुक्तांच्या आदेशानुसार देवनार कचराभूमीत दोन कूपनलिका खोदण्यात आल्या असून या कूपनलिकांना पाणी लागले आहे. आता कचराभूमीत लागणारी आग विझविण्यासाठी या कूपनलिकांमधील पाण्याचा वापर करण्यात येणार असल्याचे पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.