scorecardresearch

VIDEO : वरळीतील श्री राम मिल येथे जलवाहिनी फुटली, हजारो लीटर पाणी वाया

उच्चदाबाने मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर येत असल्यामुळे परिसर जलमय झाला आहे.

Water pipe burst at Shri Ram Mill in Worli
(फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

मुंबई : वरळी परिसरातील श्रीराम मिल येथे मुंबई महानगरपालिकेचे कामकाज सुरू असलेल्या ठिकाणी आज रविवारी पहाटे ५ च्या सुमारास पेय जलवाहिनी फुटल्यामुळे हजारो लीटर पाणी वाया गेले आहे. उच्चदाबाने मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर येत असल्यामुळे परिसर जलमय झाला आहे.

हा परिसर मुंबई महानगरपालिकेच्या जी-दक्षिण विभागात येत असल्यामुळे, येथील नियंत्रण कक्षाशी स्थानिकांनी दोन ते तीन वेळा संपर्क साधल्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या कामगारांची टीम घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी संबंधित पाहणी केली. ‘वरळीतील श्री राम मिल परिसरात मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत कंत्राटदाराकडून मलजलवाहिनीचे कामकाज सुरू आहे. त्या कामदारम्यान जलवाहिनी फुटल्याचा अंदाज आहे. या घटनेची आम्ही अधिकाऱ्यांना सविस्तर माहिती देऊ आणि कंत्राटदाराकडून या पेयजलवाहिनीची तात्काळ दुरुस्ती करून घेऊ.

VIDEO::

हेही वाचा >>> मुंबई : वाहतूक पोलीस इंटरसेप्टर वाहनांच्या प्रतीक्षेत; प्रस्ताव धुळखात, राज्य सरकारकडून अद्याप निर्णय नाही

नागरिकांच्या दैनंदिन पाणीपुरवठ्यावर याचा परिणाम होणार नाही, यावर आमचे विशेष लक्ष असेल’, असे आता जी-दक्षिण विभागाच्या कामगारांकडून सांगण्यात आले आहे. पहाटेपासून हजारो लीटर पाणी वाया गेले असून, रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना व वाहनांना साचलेल्या पाण्याचा फटका बसत आहे. ही पेयजल वहिनी असल्यामुळे दैनंदिन पाणी पुरवठावर परिणाम होण्याची चिंता नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. काल सायंकाळपासूनच या जलवाहिनी गळत होती. परंतु यावर ठोस उपाययोजना केली नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.  वरळीतील श्री राम मिल परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत कंत्राटदाराकडून मलजलवाहिनीचे कामकाज सुरू असल्यामुळे, याठिकाणी वाहतूककोंडीचा सुद्धा नागरिकांना सामना करावा लागत आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-01-2023 at 10:37 IST