मुंबई: राज्यात उन्हाचा कडाका वाढू लागल्यामुळे ग्रामीण भागात पाण्याची आतापासूनच पाण्याची टंचाई जाणवू लागली असून लोकांच्या मागणीप्रमाणे टँकरने पाणीपुरवठा करण्याचे अधिकार प्रांताधिकाऱ्यांना देण्याचा निर्णय बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या झळा अधिक प्रमाणात जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे एकीकडे धरणातील पाणीसाठा कमी होत असतानाच दुसरीकडे छोटे पाणी स्रोत आटू लागले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात गावपाडय़ांमध्ये पाणीटंचाई जाणवू लागली आहे. रत्नागिरी, रायगड, पालघर, अमरावती, बुलढाणा आदी जिल्ह्यांमध्ये ६० गावे आणि ९३ पाडय़ांमध्ये सध्या टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील पाणीटंचाईबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. येत्या काळात टँकरच्या मागणीत मोठय़ा प्रमाणात वाढ होण्याची शक्यता असून त्यासाठी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांऐवजी प्रांताधिकाऱ्यांना देण्याची मागणी या वेळी काही मंत्र्यांनी केली. त्यानुसार स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन प्रांताधिकाऱ्यांनी लगेच टँकरने पाणीपुरवठा करण्यास परवानगी द्यावी अशा सूचना या वेळी देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच पाण्याचे पर्याची स्रोत यांचा शोध घ्यावा, नादुरुस्त पाणीपुरवठा योजनांची तातडीने दुरुस्ती करण्याच्या सूचनाही या वेळी देण्यात आल्या.