मुंबई : विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशातील बहुतेक ठिकाणी पारा चाळीशीपार गेला असून उन्हाच्या झळांनी राज्य पोळले आहे. मुंबईसह किनारपट्टी भागांत तुलनेने कमाल तापमान कमी आहे. मुंबईत ३४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान, बुधवारी मुंबईत उष्ण व दमट वातावरणाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

मुंबईमध्ये सध्या तापमानात चढ-उतार सुरू आहे. त्यामुळे उन्हाचा तडाखा कमी झाला असला तरी वाढत्या आर्द्रतेमुळे मुंबईकरांची गेले काही दिवस काहिली होत आहे. मंगळवारी मुंबईचा पारा सोमवारपेक्षा कमी होता. तरी आर्द्रतेमुळे अस्वस्थता जाणवली. गेल्या आठवड्यापासून शहरात उष्णतेमुळे सुरू असलेली काहिली मंगळवारीही कायम होती. मागील काही दिवस मुंबईकरांना असह्य उकाडा सहन करावा लागत आहे. पुणे-नागपूरमधील तापमानाच्या तुलनेत तापमान कमी असूनही घामाच्या धारांनी मुंबईकर हैराण होतात.

अकोला सर्वाधिक उष्ण

राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद मंगळवारी अकोला येथे झाली आहे. येथे ४४.१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. त्याखालोखाल नंदुरबार (४३.५) जळगाव (४३.३), अमरावती ४३ आणि मालेगाव येथे ४२.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.