Sanjay Raut On Tipu Sultan Controversy: टिपू सुलतान प्रकरणात भारतीय जनता पार्टीने ‘आ बैल मुझे मार’, अशी भूमिका घेऊ नये. त्यांनी पक्षाच्या इतिहासातील भूमिका तपासून पाहाव्यात, अशा शब्दात शिवसेना (उबाठा) नेते राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी भाजपाला खडेबोल सुनावले. ‘महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, हे सांगण्यासाठी भाजपाची गरज नाही. भाजपाने महाराष्ट्राचे वातावरण बिघडवू नये’, असेही राऊत यांनी सुनावले. 

खासदार संजय राऊत यांनी सोमवारी (१६ फेब्रुवारी) सकाळी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी टिपू सुलतानवरुन सुरु असलेल्या राजकारणावरुन भाजपावर सडकून टीका केली. भारतीय जनता पार्टीला काम धंदा नाही असे म्हणत, शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, विद्यार्थी आणि नोकरदारांचे प्रश्न यावर भाजपाने कधी भाष्य केलं आहे का? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.

महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा

‘मुंबईत मेट्रोचा पूल कोसळून लोक मरण पावले, डोनाल्ड ट्रम्पने देशाला गुलाम केलं याबाबत भाजपा बोलत नाही. पण, राज्यात हिंदू – मुस्लिमांच्या संदर्भात ठिणगी टाकता येईल का? असे प्रश्न निर्माण करुन लोकांना भ्रमिष्ट करायचे’, अशी टीका राऊतांनी केली. मालेगाव उपमहापौरांनी दिलगिरी व्यक्त करुन दालनातील टिपू सुलतानचा फोटो हटविल्यानंतर या विषयावर पडदा टाकायला हरकत नाही.  पण, भाजपा आणि कंपनीने या विरोधात राज्यभर आंदोलन केलं या आंदोलनाची गरज नव्हती. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे हे सांगायला भाजपाची गरज नाही. इतिहासात काही नोंद आहेत त्या नोंदी भाजपालाही बदलता येणार नाहीत, असे राऊत म्हणाले. 

रामनाथ कोविंद यांच्या वक्तव्याचा संदर्भ

भाजपाने नियुक्त केलेले माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कर्नाटक विधानसभेत टिपू सुलतानचा राष्ट्रपुरुष म्हणून कसा उल्लेख केला? तेव्हा भाजपाकडून त्यांना का रोखण्यात आलं नाही? मुंबई, अकोलामध्ये सत्ता असताना टिपू सुलतानच्या नावाने प्रकल्प करण्यात आले. मुंबईत रस्ते आणि बगिच्यांना नावे देण्यासाठी विद्यमान महापौर रितू तावडे आणि अमित साटम यांचे अनुमोदन आहे, अशी आठवण संजय राऊत यांनी करुन दिली.   

भाजपाने आ बैल मुझे मार अशी भूमिका घेऊ नये – राऊत

भाजपाने टिपू प्रकरणी आ बैल मुझे मार अशी भूमिका घेऊ नये. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे हे सांगायला भाजपाची गरज नाही. भाजपा मुस्लिम समजाला असे निर्णय घेण्यासाठी प्रवृत्त करत आहेत, असे संजय राऊत म्हणाले. भाजपाने महाराष्ट्राचं वातावरण बिघडवू नये, येत्या काळात कुठल्याही निवडणुका नाहीत त्यामुळे कशासाठी तोंडाचा फेस करायचा? असा टोला लगावताना टिपू सूलतानचा फोटो हटविण्याबाबत महाराष्ट्र सरकारने आदेश काढावा, असे राऊत म्हणाले.

‘आरएसएस’वर टीका

टिपू सूलतान इंग्रजांसोबत लढताना शहीद झाला. इंग्रजांसोबत लढताना मरण आले त्यामुळे त्याला अनेकजण स्वातंत्र्यसैनिक मानतात, असा एक समज आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देखील याप्रकरणी पुढे येऊन देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात कोण शहीद झालं कोणाला खरचटलं हे सांगायला हवं. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात भाजपा कुठे होता? अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी कुठे होते त्यांनी स्पष्ट करावं, अशा शब्दात राऊतांनी आरएसएस आणि भाजपावर टीका केली.