मुंबई : दरवर्षी शहरात पाणी साचण्याची नवीन ठिकाणे निर्माण होत आहेत. परंतु पाणी साचण्याच्या काही जुन्या ठिकाणांचा अभ्यास करून त्यावर अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना केल्या जाऊ शकतात, असे मत अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
दरम्यान, हिंदमाता येथील साठवण टाकीमुळे संबंधित परिसरात साचणाऱ्या पाण्याची तीव्रता कमी झाली आहे. तरीही हिंदमाता साठवण टाकीवर फ्लो मीटर बसवावेत, सर्व पंप अधिक परिणामकारक पद्धतीने कार्यान्वित राहण्यासाठी सात पंपांची क्षमता एकसमान ठेवावी, फ्लो मीटरद्वारे किती पाण्याचा उपसा केला जातो, याचे निरीक्षण नोंदवावे, तसेच उपसा केंद्राचे परिचालन अधिक परिणामकारक होण्यासाठी दक्ष राहावे, असे आदेश बांगर यांनी यंत्रणांना दिले.
ही आहेत पाणी साचण्याची ठिकाणे
महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागामार्फत विविध कामे सुरू आहेत. या अनुषंगाने अतिवृष्टीच्या वेळी पूर्व उपनगरे आणि शहर विभागातील पाणी साचण्याच्या ठिकाणांची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी शुक्रवारी पाहणी केली. तसेच, अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजनांची सविस्तर माहिती घेऊन आवश्यक ते आदेश दिले. मानखुर्द – महाराष्ट्र नगर येथील भुयारी मार्ग, चेंबूरस्थित शेल कॉलनी येथील भुयारी मार्ग, नाला, टेंभे पूल, कुर्ला जंक्शन येथील स. गो. बर्वे मार्ग येथील चंद्रोदय सोसायटी यांसह शहर विभागातील चुनाभट्टी रेल्वे स्थानक, हिंदमाता पावसाळी पाणी साठवण टाकी (होल्डिंग पॉण्ड) इत्यादी ठिकाणी बांगर यांनी पाहणी दौरा केला.
शहर भागातील हिंदमाता या सखल भागातील पाणी निचरा व्यवस्थेची बांगर यांनी पाहणी केली. हिंदमाता येथील जल साठवण टाकी, सात उपसा पंप, मुख्य जलवाहिनी, प्रमोद महाजन उद्यानातील साठवण टाकी, सेंट झेविअर्स मैदान येथील साठवण टाकी यांच्या जल साठवण प्रक्रियेचा आढावा घेताना त्यांनी उपरोक्त आदेश दिले. मानखुर्द महाराष्ट्र नगर येथील भुयारी मार्ग सखल भागात आहे.
त्यामुळे येथे दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचते. सखल भाग असल्याने पाण्याचा प्रवाह वळवणे शक्य नाही, मात्र कार्यक्षम पद्धतीने उपाययोजना केल्यास पावसाळी पाणी साचण्याची तीव्रता मोठ्या प्रमाणावर कमी होऊ शकते. त्यासाठी रेल्वे हद्दीत लघु पाणी उपसा केंद्र उभारण्याचे प्रस्तावित आहे. त्यात पुरेशा क्षमतेची साठवण टाकी, ताशी तीन हजार क्यूबिक मीटर क्षमतेचे प्रत्येकी तीन पंप बसवणे आदी कामांचा समावेश आहे.
या कामाची निविदा प्रक्रिया सुरू आहे. महाराष्ट्र नगर येथे रेल्वे रुळांलगत पश्चिम दिशेने एक नाला वाहतो. या नाल्याचे खोलीकरण व रुंदीकरण करणे गरजेचे आहे. या कामाचे सर्वेक्षण करून पावसाळ्यापूर्वी निविदा प्रक्रिया राबवावी. येत्या १ ऑक्टोबरपासून प्रत्यक्षात कामाला सुरुवात करून पुढील पावसाळ्यापर्यंत हे काम पूर्ण करावे, असे निर्देश त्यांनी दिले.
रेल्वेरुळांलगत साचणारे पाणी
चेंबूरस्थित श्रमजीवी नाल्याचा उतार कमी असल्यामुळे पाणी संथगतीने पुढे जाते. त्यासाठी नाल्याची वहन क्षमता वाढवावी, नाल्यातील गाळ परिणामकारक पद्धतीने काढावा, याची दक्षता घ्यावी. तसेच पूर प्रतिबंधक दरवाजा दुरुस्त करून घ्यावा. अतिवृष्टीच्या वेळी पूर प्रतिबंधक दरवाजा नादुरूस्त होणार नाही, याची दक्षता घेण्याबाबत अधिकाऱ्यांना सांगण्यात आले.
कुर्ला (पूर्व) जंक्शन येथील चंद्रोदय सोसायटी हे पारंपरिकदृष्ट्या पावसाळी पाणी साचण्याचे ठिकाण आहे. मागील दोन वर्षांपासून येथे मेट्रोची कामे सुरू असल्याने पाणी साचण्याची तीव्रता वाढली आहे. हाऊसिंग सोसायटीच्या पर्जन्य जलवाहिनीमध्ये मेट्रो प्रकल्पाअंतर्गत खांब उभारला असून मेट्रोकडून जुन्या वाहिनीला समांतर अशी नवीन पर्जन्यजल वाहिनी बांधून घेण्यात आली आहे. चुनाभट्टी रेल्वे स्थानक, हायवे सोसायटी, रेल्वे स्थानकातील मोरी समर्थ नगर सोसायटी, वांद्रे कुर्ला संकुल जोडरस्त्याखालील परिसर आदी भागांची बांगर यांनी पाहणी केली.
हायवे सोसायटी ही जमीनीच्या सरासरी पातळीपेक्षा खालच्या भागात वसलेली वसाहत आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचते. हे पाणी पूर्व द्रुतगती महामार्गालगतच्या पर्जन्य जलवाहिनीत सोडण्यात येते. तेथून हे पाणी रेल्वे स्थानक परिसरात येते. रेल्वे स्थानकातील पर्जन्य जलवाहिनीची वहन क्षमता कमी असल्याने अतिवृष्टीच्या वेळी पाणी रेल्वे रुळांवर साचते. त्यामुळे हार्बर रेल्वे सेवा विस्कळीत होते. यावर उपाय म्हणून रेल्वे प्रशासन जल साठवण टाकीमधील पाणी उपसा करून समर्थ नगरकडे जाणाऱ्या रस्त्याकडे टाकते. हे पाणी बीकेसी कनेक्टरखालील नाल्याला मिळते. या नाल्याचे खासगी विकासकामार्फत काम सुरू आहे.
संबंधित काम येत्या ३१ मेपूर्वी करावे. नाल्याचा उतार योग्य राहील याची खातरजमा करावी, असेही बांगर यांनी सांगितले .