मुंबई : महिला कर्मचाऱ्यांनी आपल्या आत्मसन्मानासाठी कोणतीही तडजोड करू नये, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेविका डॉ. स्मिता कोल्हे यांनी केले. महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त प्रकाशगड मुख्यालयात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या बोलत होत्या. यावेळी डॉ. रवींद्र कोल्हे आणि डॉ. स्मिता कोल्हे यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी संचालक (वित्त) बाळासाहेब थिटे, संचालक (संचालन) संजय मारुडकर, संचालक (खनिकर्म) दिवाकर गोखले उपस्थित होते. मेळघाट या आदिवासी बहुल भागात आलेले अनुभव कथन करताना डॉ. स्मिता कोल्हे म्हणाल्या की, शहरातील समृद्ध जीवनशैली ते ४० किलोमीटर चालत एक-एक लाकूड जमवत बांधलेली झोपडी हे स्वधर्माच्या शोधातून स्वीकारलेले होते. त्यामुळे वैयक्तिक हल्ले आणि आदिवासी बंधूंचे प्रेम हे दोन्ही पाहताना कधीही निराश झालो नाही. मेळघाटातील आदिवासींच्या गरजांचा अभ्यास केला आणि त्याबाबत शिक्षणही घेतले. शास्त्रीय दृष्टिकोनातून मार्ग काढून त्यांच्या गरजांची पूर्तता केली. यामध्ये आरोग्य सेवा, कृषी विकास, सामाजिक प्रश्न, रस्ते, पाणी, वीज, सरकारी धान्यपुरवठा इत्यादी बाबींवर सुमारे ३२ वर्षे पणाला लावली, असे डॉ. रवींद्र कोल्हे यांनी स्वत:चा प्रवास उलगडताना सांगितले. वित्त विभागाचे संचालक बाळासाहेब थिटे यांनी ‘पणती’ या कवितेच्या माध्यमातून स्त्री शक्तीचे महत्त्व विषद केले. तर संचालन विभागाचे संचालक संजय मारुडकर यांनी ‘महानिर्मिती’मधील महिला कर्मचाऱ्यांचे विशेष योगदानावर प्रकाशझोत टाकला. सूत्रसंचालन सुप्रसिद्ध सूत्रसंचालिका मानसी सोनटक्के यांनी, तर आनंद कोंत यांनी प्रास्ताविक केले. स्वप्निता राठोड यांनी आभार प्रदर्शन केले.