शीना बोरा हत्या प्रकरणाला दिल्लीतील आरुषी प्रकरण बनू देणार नाही, हा मुंबई पोलिसांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे असे वक्तव्य मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी केले आहे. मारिया यांनी रविवारी एका वृत्तपत्राला मुलाखत दिली त्यावेळी ते बोलत होते.
मारिया म्हणाले की, हा मुंबई पोलिसांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न असून, शीना बोरा हत्या प्रकरणाला दिल्लीतील आरुषी प्रकरण बनू देणार नाही. ३० सप्टेंबरला मला बढती मिळणार असून त्यापूर्वीच मला इंद्राणी प्रकरणातील सर्व महत्त्वाचे पुरावे गोळा करुन ठेवायचे आहेत असेही त्यांनी म्हटले आहे. प्रसारमाध्यम स्वतःच इंद्राणी प्रकरणाची चौकशी करत असल्यामुळे आम्हाला पुरावे गोळा करण्यात अडथळा येत असल्याचा आरोपही त्यांनी केला. शीनाची हत्या तीन वर्षांपूर्वी झाल्याने पुरावे गोळा करताना अडचणी येत आहेत. दहशतवाद्याची चौकशी करताना संयम ठेवावे लागत नाही, पण इंद्राणी उच्चशिक्षीत आहे हेच आमच्यासमोरील आव्हान आहे. मुंबई पोलिसांची उत्तम तुकडी या प्रकरणाचा तपास करत आहे, हे पथक गेल्या अनेक दिवसांपासून घरीदेखील गेले नाहीत असेही त्यांनी सांगितले.