मुंबई : राज्य सरकारच्या तिजोरीवरील खर्चाचा भार कमी करण्यासाठी मंत्रालयासह विविध शासकीय कार्यालयातील कामे बाह्ययंत्रणेच्या माध्यमातून करून घेण्याचा आणि त्यासाठी अनेक कामांचे (आऊटसोर्सिग) करण्याचा निर्णय बुधवारी राज्य सरकारने घेतला. या निर्णयामुळे २० ते ३० टक्के खर्चात बचत होईल असा दावा केला जात असून कुशल आणि अकुशल अशी दोन्ही माध्यमातील पदे बाह्ययंत्रणेच्या माध्यमातून भरली जाणार आहेत. विकास कामांना पुरेसा निधी मिळावा तसेच प्रशासनावरील खर्चात काटकसर करण्यासाठी रिक्त जागांवर नव्याने भरती न करता ही कामे बाह्ययंत्रणेच्या माध्यमातून करून घेण्यात येणार आहेत. वित्त विभागाने बुधवारी याबाबतचा शासन निर्णय जाहीर केला. त्यानुसार संगणक अभियंता, डीटीपी ऑपरेटर, दूरध्वनी चालक, वाहनचालक, माळी व इतर अर्धकुशल कामगार, उद्वाहन चालक, शिपाई, चपराशी, चौकीदार, सफाई कर्मचारी, मदतनीस, हमाल आदी पदे बाह्ययंत्रणेकडून भरण्यात येणार आहेत. तर मंत्रालयातील लिपिक टंकलेखक, स्वीय साहाय्यक, लघुटंकलेखक आणि सर्व कार्यालयांचे कनिष्ठ लेखापाल ही पदे मात्र सरकारी भरतीमधूनच भरण्यात येतील. बाह्ययंत्रणेकडून कामे करून घेण्यासाठी कोणतीही नवीन पदे निर्माण केली जाणार नाहीत. तसेच बाह्ययंत्रणेकडून कामे करून घेताना नियमित पदे भरून ही कामे करून घेण्यासाठी येणाऱ्या खर्चाच्या तुलनेत २० ते ३० टक्के बचत होईल अशा रीतीने करून घ्यावीत. तसेच बाह्ययंत्रेणेद्वारे कामे करून घेताना संबंधित कंपनी किंवा संस्थेबरोबर करार करण्याची सूचनाही देण्यात आल्या आहेत.