म्हाडाच्या सोडतीचे वेळापत्रक अनिश्चित मुंबई : गेल्या तीन वर्षांपासून मुंबईकर म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या घरांच्या सोडतीच्या प्रतीक्षेत असून गोरेगावमधील पहाडी परिसरात सुरू असलेले इमारतींचे बांधकाम फेब्रुवारी २०२३ मध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात काढण्यात येणाऱ्या घरांच्या सोडतीमध्ये पहाडी येथील तब्बल २६०० सदनिकांचा समावेश होईल. मात्र ही सोडत नेमकी कधी काढण्यात येणार हे निश्चित नाही. मुंबईत गृहनिर्मितीसाठी म्हाडाकडे मोकळी जागा नसल्याने भविष्यात इमारतींच्या पुनर्विकासावरच अवलंबून रहावे लागणार आहे. सध्या मंडळाचे काही ठिकाणी गृहप्रकल्प सुरू असून पडाडी, गोरेगाव येथील म्हाडाच्या भूखंडावरील गृहप्रकल्प हा त्यापैकीच एक मोठा प्रकल्प. मात्र या जमिनीवर कुसुम शिंदे नामक महिलेने मालकी हक्काचा दावा केनंतर हे प्रकरण न्यायालयात गेले. जवळपास २५ वर्षे म्हाडाने न्यायालयीन लढा दिला आणि न्यायालयीन लढाई जिंकून २०१६ मध्ये हा भूखंड मिळविला. त्यानंतर या भूखंडावरील अतिक्रमण हटविण्यात आले व गृहप्रकल्पाचा आराखडा तयार करुन गृहनिर्मितीस सुरुवात करण्यात आली. मुंबई मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या भूखंडावर पाच ते सात हजार घरांच्या निर्मितीचे उद्दिष्ट आहे. तर अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च अशा सर्व वर्गाला या प्रकल्पात सामावून घेण्यात आले आहे. येथे मोठय़ा संख्येने घरे उपलब्ध होणार असली तरी आजघडीला प्रत्यक्षात येथे तीन हजार ०१५ घरांचे काम सुरू आहे. त्यापैकी दोन हजार ६०० घरांचे बांधकाम सध्या वेगात सुरू आहे. ही घरे अत्यल्प आणि अल्प गटातील असून येत्या सोडतीत या घरांचा समावेश करण्यासाठी त्यांच्या बांधकामाला वेग देण्यात आला आहे. येत्या फेब्रुवारी २०२३ मध्ये २६०० घरांचे बांधकाम पूर्ण करण्यात येणार असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले. या प्रकल्पातील अत्यल्प गटासाठीची घरे ३२२.५९ चौ फुटांची आहेत. अल्प गटातील घरे ४८२.८० चौ फुटांची आहेत. सात मजली इमारतीत ही घरे असणार आहेत. सोडतीकडे लक्ष मागील तीन ते साडेतीन वर्षांपासून मुंबईकर म्हाडाच्या सोडतीची वाट पाहत आहेत. सोडतीत सर्वाधिक घरे ही पहाडी, गोरेगावमधील असतील, असे मंडळाकडून वारंवार सांगितले जात आहे. आता मंडळाने स्पष्ट केल्याप्रमाणे सोडतीत पहाडी, गोरेगाव येथील दोन हजार ६०० घरांचा समावेश असेल असा अंदाज वर्तविण्यात येत असून या घरांचे बांधकाम फेब्रुवारी २०२३ मध्ये पूर्ण होणार आहेत. त्यामुळे सोडत झाल्यानंतर या घरांचा ताबाही लवकर देणे मंडळाला शक्य होणार आहे. आता केवळ सोडत कधी जाहीर होते याचीच सर्वाना प्रतीक्षा आहे.