मुंबई : तब्बल दोन वर्षे करोना संसर्गाशी कडवी झुंज दिल्यानंतर धारावीचा परिसर अखेर करोनामुक्त झाला. धारावीतील उपचाराधीन रुग्णांची संख्या शून्य झाली असून गेल्या आठवडय़ाभरात धारावीत एकाही नवीन रुग्णाची नोंद झाली नाही.एकेकाळी मुंबईतील करोनाचा अतिसंक्रमित भाग असलेल्या धारावीतील उपचाराधीन रुग्णांची संख्या गेल्या महिन्याभरात वेगाने कमी होऊ लागली होती. मात्र एक दोन रुग्ण आढळत असल्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्या शून्यावर येत नव्हती. २४ मार्च रोजी धारावीतील उपचाराधीन रुग्णांची संख्या शून्यावर आली आहे. धारावीत करोनाचा स्फोट होईल आणि मृतांची संख्या वाढेल भीती वर्तवली जात होती. मात्र, पालिकेने केलेल्या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे धारावीत करोनाला थोपवण्यात यश आले आहे. धारावीत एकेकाळी दिवसाला १०० रुग्ण सापडत होते, पण पालिकेने केलेल्या उपाययोजनांमुळे रुग्णसंख्या आटोक्यात आली. धारावीत आता करोनाचा एकही रुग्ण नाही. पहिल्या व दुसऱ्या लाटेतही उपचाराधीन रुग्णांची संख्या पाच ते सातपर्यंत खाली आली होती. मात्र त्यानंतर पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली होती. दोन वर्षांत प्रथमच धारावीत उपचाराधीन रुग्णसंख्या शून्यावर आली आहे. १ एप्रिल २०२० रोजी धारावीत पहिला रुग्ण सापडला होता. साधारणपणे अडीच किलोमीटर परिसरात पसरलेल्या धारावीची लोकसंख्या सात लाख इतकी आहे. एक किलोमीटर परिसरात अडीच लाख लोक इतकी दाट घनता या भागात आहे. तिसऱ्या लाटेत येथील दैनंदिन रुग्णसंख्या १५० वर गेली होती. तर २८ जानेवारीनंतर संसर्ग ओसरू लागला. या परिसरात पालिकेने केलेल्या प्रयत्नांची दखल ‘धारावी मॉडेल’ म्हणून जगभरात घेतली गेली. धारावीत आतापर्यंत ८६५२ नागरिकांना करोनाचा संसर्ग होऊन गेला आहे. मात्र पालिका यंत्रणेने, आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी केलेले अथक प्रयत्न, तपासण्या, चाचण्या, लसीकरण यामुळे हे ध्येय गाठणे शक्य झाल्याची प्रतिक्रिया सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी व्यक्त केली आहे.