मध्यवर्ती कारागृहात संचारबंदी लागू करण्यात आल्यानंतर कारागृहातील अधिकारी व कर्मचारीही कारागृहाच्या आत अडकले होते. गेले २१ दिवस ते कारागृहात होते. आज १०२ कर्मचारी व अधिकारी कारागृहातून बाहेर पडले.

राज्यातील मुंबई मध्यवर्ती कारागृह, ठाणे मध्यवर्ती कारागृह, येरवडा मध्यवर्ती कारागृह, भायखळा जिल्हा कारागृह, व कल्याण जिल्हा कारागृह, औरंगाबाद, नाशिक आणि नागपूर मध्यवर्ती कारागृहात संचारबंदी लागू करण्यात आली. या काळात कारागृह अधीक्षकांपासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वाना कारागृहात राहूनच काम करायचे होते. कारागृहात काम करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाकडे कारागृहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दूरध्वनी व भ्रमणध्वनी क्रमांक देण्यात आले होते. त्यांच्या कुटुंबाला काही अडचण भासली  तर त्यांना वरिष्ठांकडे संपर्क साधावा लागत होता. याप्रकारे त्यांच्या अडीअडचणीचे निराकरण करण्यात आले. १ मे २०२० पासून १०२ कर्मचारी व अधिकारी कारागृहाच्या आत होते. गेले २१ दिवस सेवा दिल्यानंतर ते बाहेर पडले.

त्यानंतर १०५ अधिकारी व कर्मचारी पुन्हा कारागृहात गेले व सेवा देत आहेत. पुढील आदेशापर्यंत ते कारागृहात सेवा देतील, अशी माहिती कारागृह अधीक्षक अनुपकुमार कुमरे यांनी दिली.