|| महेश बोकडे राज्यातील ११ महिन्यांतील आकडेवारी माता व बालमृत्यू रोखण्यासाठी सरकार दरवर्षी कोटय़वधी रुपयांचा खर्च करीत असले तरी आजही महाराष्ट्रात महिलांची प्रसूती घरीच होण्याचे प्रमाण कमी झालेले नाही. आरोग्य विभागाकडील नोंदीनुसार, १ एप्रिल २०१८ ते २८ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत राज्यात ११ हजार ९५० महिलांची प्रसूती रुग्णालयांऐवजी घरीच झाली आहे. नंदूरबार, अमरावती आणि गडचिरोली जिल्ह्य़ात हे प्रमाण अधिक आहे. राज्यातील आदिवासी पाडे, दुर्गम गावांत आजही दळणवळणाची पुरेशी सोय नाही. त्यामुळे घरीच प्रसूतीचा पर्याय स्वीकारला जातो. सुरक्षित मातृत्वासाठी केंद्र व राज्य सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानापासून मातृत्व वंदन योजनांसह इतर योजनांतून प्रत्येक वर्षी कोटय़वधी रुपये खर्च केले जातात. त्यामुळे सर्वत्र रुग्णालयात होणाऱ्या प्रसूतीच्या प्रमाणात वाढ झाली. मात्र, आदिवासीबहुल नंदूरबार, मेळघाट, गडचिरोलीसारख्या भागात मोठय़ा संख्येने प्रसूती घरी होत आहेत. राज्यात १ एप्रिल २०१८ ते फेब्रुवारी २०१९ या कालावधीत एकूण १३ लाख ५७ हजार ५९७ प्रसूती झाल्या. पैकी ११ हजार ९५० प्रसूती घरीच झाल्या. महापालिका हद्दीतही २२२३ प्रसूती घरीच मुंबईसह राज्यातील २६ महापालिकांमध्येही २२२३ महिलांची प्रसूती घरीच झाल्याची नोंद आहे. सर्वाधिक घरी प्रसूती भिवंडी (९२६), मालेगाव (७७३), नवी मुंबई (१००), वसई-विरार (९०) येथे नोंदवण्यात आली आहे. माहेरघरसह इतर योजनांमुळे घरात प्रसूतींचे प्रमाण केवळ १ टक्क्यावर आणण्यात यश आले आहे. यापुढे सर्व दुर्गम गावांत लक्ष केंद्रित करून ही संख्या कमी करू. - डॉ. अर्चना पाटील, संचालक (२), कुटुंब व कल्याण, आरोग्य सेवा, पुणे