मोठय़ा उत्पादन कंपन्यांसह व्यापाऱ्यांना कोटय़वधींचा फटका; एकटया नागपुरात चारशे कोटींचा व्यवसाय प्रभावित नागपूर : महिल्यांच्या सर्व सौंदर्य प्रसाधनांच्या मागणीत प्रचंड घट झाली आहे. विशेष म्हणजे, करोनामुळे चेहऱ्यावर मुखपट्टी बांधणे बंधनकारक असल्याने लिपस्टिकसह इतर सर्व सौंदर्य प्रसाधनांच्या मोठय़ा कंपन्यांना कोटय़वधींचे नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे एकूणच राज्यातील सर्व ब्युटी पार्लरसह बाजारपेठ कोलमडली असून आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी आपले उत्पादन निम्म्यावर आणले आहे. गेल्या आíथक वर्षांत जवळपास ७० टक्के फटका या क्षेत्राला बसला असून केवळ नागपुरात चारशे कोटी व्यवसाय प्रभावित झाला आहे. एकीकडे करोनाचे संकट आणि त्यामुळे असलेली आíथक चणचण तर दुसरीकडे लग्नसमारंभ अथवा सार्वजनिक कार्यक्रमांवर आलेल्या निर्बंधामुळे गेल्या वर्षांभरापासून सौंदर्य प्रसाधनांची बाजारपेठ कोलमडली आहे. या बाजारपेठेत दोन हजारहून अधिक कंपन्यांची विविध उत्पादने असून यामध्ये लॉरिअल, लॅकमे, एल-एटीन, मॅबेलीन, डिऑर, रेवलॉन अशा विदेशी कंपन्यांच्या प्रसाधनांची मागणी अग्रक्रमांकावर असते. सर्व प्रकारची प्रसाधने विदेशातून येतात तर काही भारतीय बनावटीचे देखील आहेत. सध्या पुरुषांसाठी देखील विविध प्रकारची उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत. परंतु जेव्हापासून करोना आला तेव्हापासून खरेदी मर्यादित होत आहे. सध्या ब्युटी पार्लरसह सर्व सलून बंद असल्याने त्याचा फटका जास्त बसत आहे. तसेच मुखपट्टी बंधनकारक असल्याने लिपस्टिकसह चेहऱ्यावर लावण्यात येणाऱ्या सर्व प्रसाधनांची विक्री कमालीची घटली आहे. व्यापाऱ्यांच्या मते, केवळ नागपुरात वर्षांला चारशे कोटींचा व्यवसाय होत असतो. मात्र करोनामुळे हा व्यवसाय ७० टक्क्यांनी खाली घसरला आहे. सर्व सार्वजनिक कार्यक्रम बंद असल्याने नागरिक केवळ जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीलाच महत्त्व देत असून महिलांचे सजणे आणि नटणे जवळपास बंद झाले आहे. विशेष करून नेलपेन्ट, आय लायनर, लिपस्टिक, फाऊंडेशन कॉमपॅक्ट, प्रायमर, ब्लश, रुज, आय श्ॉडो, मस्करा, हायलायटर आदी नेहमीच्या प्रसाधा नांकडेही महिलांनी पाठ फिरवली आहे. अनेक व्यापाऱ्यांकडे मागणी कमी असल्याने त्यांनी आपला व्यवसाय बंद केला आहे. मल्टी नॅशनल आणि इंटरनॅशनल कंपन्यांनी मुळातच आपले उत्पादन कमी केले आहे. नागपुरात वर्षांकाठी चारशे कोटींचा व्यवसाय प्रभावित झाला आहे. - सुनील भाटिया, अध्यक्ष, कंझ्युमर प्रॉडक्ट डिस्ट्रीब्युशन असोसिएशन. करोनामुळे आमचा व्यवसाय अडचणीत आला आहे. राज्यात आमच्या समाजातील पंचेवीस लोकांनी आíथक परिस्थिती खराब असल्याने आत्महत्या केली. सध्या सरकारलाही दोष देणे योग्य नाही. मात्र बँकेच्या कर्जाचे हप्ते, वीज बिल, दुकानाचे भाडे याबाबतीत मदत करून सरकारने आमच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. - भाग्यलता तळखांडे, अध्यक्ष, महाराष्ट्र नाभिक संघटना.