|| महेश बोकडे

परिवहन खात्याच्या अहवालातील माहिती:– विदर्भात जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांच्या कालावधीत गेल्यावर्षीच्या तुलनेत अपघाती मृत्यू वाढ तर, राज्यात घट झाली आहे. परिवहन खात्याच्या अहवालातून ही माहिती पुढे आली आहे. केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री फडणवीस यांचे गृहनगर नागपुरात अपघातातील मृत्यू संख्या वाढली आहे.

काही वर्षांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनीही राज्यातील अपघातग्रस्त स्थळांची यादी करून अपघातांची कारणे जाणून घेतली होती. या स्थळांवरील रस्त्यांवरील दोष दूर करण्यासाठी कोटय़वधींचा खर्च केला गेला. तरीही अपघाती मृत्यू वाढले आहेत. १ जानेवारी ते ३१ ऑगस्ट २०१८ मध्ये राज्यात २३ हजार ४३६ अपघातांमध्ये ८ हजार ८४८ जणांनी प्राण गमावले.

२०१९ मध्ये याच कालावधीत २२ हजार ८५४ अपघातात ८ हजार ६८३ मृत्यू झाले. या काळात २०१८ मध्ये नागपूर शहरात ७३० अपघातांत १५८ मृत्यू तर २०१९ मध्ये ७०४ अपघातात १६४ जणांचा मृत्यू झाला.  नागपूर ग्रामीणमध्ये २०१८ मध्ये ६७१ अपघातात २१२ मृत्यू तर २०१९ मध्ये ५९३ अपघातात २५७ मृत्यू झाले.

मुंबई, पुणे, नाशिकमध्ये मृत्युसंख्या घटली

मुंबई शहरात वरील कालावधीत २०१८ मध्ये ३१३ मृत्यू झाले होते. ही संख्या २०१९ मध्ये २६७ वर आली. नवी मुंबईत मृत्यूसंख्या १९३ वरून १७५ वर आली. ठाण्यात १७५ वरून १५०, पुणे शहरात २६९ वरून १२४, नाशिकमध्ये १३९ वरून १०८ इतकी  मृत्युसंख्या नोंदवली गेली.

राज्यात आवश्यक उपाय केल्यावर अपघात व त्यातील मृत्यू कमी झाले आहेत. अपघात वाढलेल्या प्रत्येक जिल्ह्य़ातील रस्ता सुरक्षा समितीला तातडीने उपाय करण्याच्या सूचना केल्या असून येत्या काळात तेथेही ही संख्या कमी झालेली दिसेल.’’

– जितेंद्र पाटील, सहआयुक्त, रस्ते सुरक्षा समिती (परिवहन विभाग), मुंबई.