३० मृत्यू; ६५८ नवे बाधित, ८९४ करोनामुक्त

नागपूर :  शहरी व ग्रामीण भागात २४ तासांत ३० करोनाबाधितांचे मृत्यू तर ६५८ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान, शहरात सोमवारीही नवीन बाधितांच्या तुलनेत करोनामुक्तांची संख्या अधिक होती. त्यामुळे जिल्ह्य़ातील सक्रिय बाधितांची संख्या अनेक दिवसानंतर आठ हजाराहून कमी नोंदवली गेली आहे.

जिल्ह्य़ात दिवसभरात नोंदवलेल्या ६५८ एकूण रुग्णांतील ५२९ रुग्ण शहर, ११८ रुग्ण ग्रामीण तर ११ रुग्ण जिल्ह्य़ाबाहेरील आहेत. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या बाधितांची संख्या ६८ हजार ५५२, ग्रामीण १८ हजार १८७, जिल्ह्य़ाबाहेरील ४९१ अशी एकूण ८७ हजार २३० वर पोहचली आहे, तर दिवसभरात नोंदवलेल्या ३० मृत्यूंमध्ये शहरातील ११, ग्रामीणचे ८, जिल्ह्य़ाबाहेरील ११ रुग्णांचा समावेश आहे.

त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या मृत्यूंची संख्या २ हजार १२, ग्रामीण ४९९, जिल्ह्य़ाबाहेरील ३०९ अशी एकूण २ हजार ८२० वर पोहचली आहे. दरम्यान, गेल्या वीस ते पंचवीस दिवसांत एखादा दिवस वगळल्यास इतर दिवशी करोनामुक्तांच्या तुलनेत नवीन बाधितांची संख्या कमी आहे.

त्यामुळे शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या ७ हजार ८७२ वर आली आहे. त्यात शहरातील ५ हजार १२९, ग्रामीणचे २ हजार ७४३ जणांचा समावेश आहे.

चाचण्यांची संख्या पुन्हा पाच हजाराखाली

येथील शहरी भागात दिवसभरात ४ हजार ४७० तर ग्रामीणला केवळ ४६१ अशा एकूण ४ हजार ९३१ आरटीपीसीआर आणि रॅपिड अँटिजन अशा दोन्ही चाचण्या झाल्या. शासनाकडून चाचण्या वाढवण्याची सूचना असताना उलट शहरात चाचण्या कमी होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. तर आरोग्य विभागाकडून मात्र चाचण्यांसाठी नागरिकच पुढे येत नसल्याचा दावा केला जात आहे.

करोनामुक्तांची संख्या ७६ हजार पार

येथील शहरी भागात दिवसभरात ६४८, ग्रामीणला २४६ असे एकूण ८९४ जण करोनामुक्त झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या ६१ हजार ४५ तर ग्रामीणची १५ हजार ४९३ अशी एकूण ७६ हजार ५३८ वर पोहचली आहे. आजपर्यंत आढळलेल्या बाधितांच्या तुलनेत करोनामुक्तांचे प्रमाण ८७.७४ टक्के आहे.

गृह विलगीकरणातील रुग्णसंख्या पाच हजारावर

येथील शहरी व ग्रामीण भागात एकेकाळी गृहविलगीकरणात उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या दहा हजारावर गेली होती. त्यावेळी गंभीर प्रकारचे रुग्ण वाढल्याने शासकीय व खासगी रुग्णालयांत खाटा उपलब्ध होण्यासाठी रुग्णांनाही प्रचंड त्रास होत होता. परंतु आता रुग्ण संख्या कमी झाल्याने जिल्ह्य़ातील गृहविलगीकरणातील  संख्याही ५ हजार ६४ वर आली आहे.

विदर्भातील दैनिक मृत्यू

(१२ ऑक्टोबर २०२०)

जिल्हा                  मृत्यू

नागपूर                  ३०

वर्धा                     ०६

चंद्रपूर                  ०३

गडचिरोली             ००

यवतमाळ               ०१

अमरावती              ०२

अकोला                ०१

बुलढाणा               ००

वाशीम                  ०३

गोंदिया                  ०१

भंडारा                   ०५

एकूण                   ५२