महेश बोकडे 

रस्त्यावरील विक्रेत्यांकडून पुरेशी काळजी न घेता विक्री; मिश्रित, क्षमतेपेक्षा अधिक रस पिणे आरोग्यासाठी बाधक

फळ-भाज्यांचा रस पिणे तसे आरोग्यवर्धक, पण तो पिताना काही काळजी घेणे आवश्यक ठरते. प्रत्येकाच्या शरीराची रचना आणि आरोग्याच्या समस्या वेगवेगळ्या असतात. त्याला अनुरूपच विविध भाज्या व फळांचा रस घेणे योग्य ठरते, परंतु उपराजधानीतील प्रत्येक उद्यान आणि रस्त्याच्या कडेला पहाटेपासून शेकडो विक्रेते विविध भाज्या व  फळांचे रस सर्रास नागरिकांना विकतात. त्यातील कडू दुधीभोपळा आणि  तत्सम भाजी व फळांच्या रसाचे  मिश्रण मानवी आरोग्याला हानीकारक ठरतो, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.

गेल्या काही वर्षांपासून नागरिकांमध्ये आरोग्याप्रती जागृती वाढली आहे. नागपूरकरही यात मागे नाहीत.  याचा प्रत्यय सर्वच भागात विविध जिम, व्यायामशाळांची वाढलेली संख्या, उद्यान आणि मैदानांमध्ये लागलेली व्यायामासाठीची उपकरणे, सायकलिंग, मॉर्निग वॉक, जॉगिंग, स्टेटिंगचा वाढता छंद यावरून येते. फिरायला जाणाऱ्यांची गर्दी पहाटे आणि सायंकाळी ही काही ठराविक ठिकाणी दिसून येते. पश्चिम नागपूरमधील टिळक नगर, आंबाझरी, सेमिनरी हिल्स, महाराजबाग यासह मध्य नागपुरातील गांधीबाग, पाचपावलीतील उद्यान तसेच सुधार प्रन्यास आणि महापालिकेच्या विविध उद्यानात सकाळी आणि सायंकाळी हेच चित्र दिसते. सकाळी फिरायला गेल्यावर फळ किंवा भाज्यांचा रस पिण्याचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात वाढले आहे. बजाजनगर, नीरी, व्हीएनआयटी, सिव्हिल लाईन्ससह इतरही काही रस्त्यांवर व उद्यानाशेजारी रस पिणाऱ्यांची गर्दी होते.

विक्रेत्यांकडे गव्हाचे तृणरोप, कारली, भोपळा, कडूनिंब, शतावरी, जांभूळ, दुधी, बीटसह विविध भाज्यांचे रस उपलब्ध असतात. आरोग्यवर्धक असल्याने लोकंही डोळे मिटून रस पितात. परंतु कडूनिंब, शतावरी वनस्पतीमध्ये औषध गुणधर्म असतात. त्याचा रस घेतल्याने शरीरावर होणारे परिणाम  व्यक्तिपरत्वे वेगवेगळे असू शकतात. क्षमतेहून जास्त हे रस आरोग्याला अपायकारक ठरतात.

फळभाज्यांचा कडवटपणा तपासा

प्रत्येक भाज्यांचे वेगवेगळे वैशिष्टय़ असते. बाह्य़स्वरूपात ही बाब लक्षात येत नाही. काकडी, दोडकी, दुधीभोपळा या भाज्यांबाबत हा अनुभव येतो. त्यामुळे याचा रस घेण्यापूर्वी त्यातील कडवटपणाची माहिती घेणे आवश्यक असते. मात्र, रस विक्रेत्यांकडे ही सोय नसते. अनेकदा अशा प्रकारचा रस प्राशन केल्यास उलटय़ा, हगवणीचा त्रास होतो.

प्रत्येकाच्या शरीराची जडणघडण आणि आरोग्याच्या समस्या वेगवेगळ्या असतात.  त्यामुळे फळ किंवा भाज्यांचा रस नियमित घेण्यापूवी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. रस्त्यावरील विक्रेत्यांना याबाबत माहिती नसते. शक्यतो घरीच रस काढणे योग्य. प्रकृती, वय, वजन यानुसार कोणत्या भाज्या, फळे त्यांना फायद्याचे आहे, हे समजून घ्यायला हवे.

– डॉ. नितेश खोंडे, आयुर्वेद तज्ज्ञ, नागपूर</p>

आयुर्वेदात भाजी शिजवून खाण्यावर भर देण्यात आला आहे. भाज्यांच्या  रसाचे प्रमाण शरीरात अधिक झाल्यास  समस्या उद्भवू शकतात.  दोन भिन्न गुणधर्म असलेल्या भाज्या किंवा फळांचे रस एकत्र करून प्राशन केल्यास अपचनाची समस्या निर्माण होते. औषधाचे गुणधर्म असलेले औषध २० ते ४० एमएलच्या वर घेऊ नये असे आयुर्वेदात सांगण्यात आले आहे, परंतु रस १०० एमएलपेक्षा अधिक  घेतला जातो. ते आरोग्यास अपायकारक आहे.

– डॉ. मोहन येंडे, प्राध्यापक,

भाऊसाहेब मुळक आयुर्वेदिक कॉलेज, बुटीबोरी