संग्राम बारमधील घडलेल्या खून प्रकरणात शनिवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने निकाल दिला असून सबळ पुराव्याअभावी सर्व आरोपींची निर्दोष सुटका केली. नितीन शिमले, आकाश तराळे, अभय राऊत, प्रशांत धोटे, स्वप्नील साळुंखे, राहुल कार्लेवार, अमोल जुनघरे, आकाश मिश्रा, सचिन रॉय, जितेंद्र गावंडे, राहुल शिमले अशी निर्दोष सुटका करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. जगनाडे चौकात काँग्रेसचे नगरसेवक प्रशांत धवड यांच्या मालकीचे संग्राम बार आहे. या बारमध्ये ऑर्केस्ट्राची परवानगी होती. सन १० जून २०१४ सुमित सुरेश तिवारी (३०) हा मोहम्मद रियाज हक (३०) आणि इतर मित्रांसह बारमध्ये गेला होता. त्यावेळी आरोपीही बारमध्ये बसले होते. दारू पित असताना गाण्याच्या फर्माईसवरून हक आणि आरोपींमध्ये वाद सुरू झाला. त्यावेळी सुमितने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपींनी सुमित आणि हक यांना लोखंडी रॉडने मारहाण केली. यात सुमितचा मृत्यू झाला. हक हा जखमी झाला होता. त्यानंतर आरोपी पळून गेले होते. घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपींना अटक केली होती. या प्रकरणाची सुनावणी न्या. अशोक धामेचा यांच्यासमक्ष झाली. साक्षीदार तपासून आणि सर्व पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायायालयाने सर्व आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली. आरोपींच्या वतीने अॅड. आर. के. तिवारी, अॅड. आर. बी. गायकवाड, अॅड. प्रफुल्ल मोहगांवकर, अॅड. चेतन ठाकूर आणि अॅड. अशोक भांगडे यांनी बाजू मांडली. सरकारतर्फे सरकारी वकील विजय कोल्हे यांनी ही बाजू मांडली.