नवाबला परत बोलवा, ‘ऑपरेशन‘टी-१’ थांबवा आम्हाला वनखात्याच्या अधिकाऱ्यांवर विश्वास आहे, पण वनखात्यातील वरिष्ठांना मात्र त्यांच्या अधिकाऱ्यांवर विश्वास नाही. वनखात्यात नेमबाजीत सुवर्णपदक पटकावलेले अधिकारी असताना सुद्धा वाघिणीला मारण्यासाठी भाडोत्री शिकाऱ्याला बोलावले जात आहे. नवाब शाफत अली खानला परत पाठवा आणि निर्णय होईपर्यंत ‘टी-१ ऑपरेशन’ थांबवा, अशी मागणी राळेगाव परिसरातील वाघिणीच्या बचावासाठी रस्त्यावर उतरलेल्या वन्यप्रेमींनी केली. राळेगाव येथील वाघिणीला मारण्यासाठी बोलावण्यात आलेल्या नवाबला राळेगाव परिसरातून बाहेर काढा, या मागणीसाठी वन्यजीवप्रेमींनी महाराजबाग ते संविधान चौक या दरम्यान मोर्चा काढला. या मोर्चात यवतमाळसह बुलढाणा, वाशीम, वर्धा आदी विविध शहरातील वन्यजीवप्रेमी सहभागी होते. जानेवारी २०१८ मध्ये राष्ट्रीय व्याघ्र संवर्धनाच्या संनियंत्रण समितीने हत्ती आणि वाघिणीला जेरबंद करण्यासाठी चमू देण्याची विनंती केली होती, तेव्हाच व्यवस्था का केली नाही. त्याचवेळी वाघिणीला जेरबंद केले असते तर ही वेळ आली नसती. मनुष्यबळीसाठी वाघीण नाही तर वनखाते जबाबदार आहे. चंद्रपूर आणि आजूबाजूच्या परिसरात अशा प्रकरणात वाघाला पकडले जाते मात्र, राळेगावमध्ये वाघिणीला ठार मारण्याचा निर्णय होतो. शाफत अली खानला बोलावण्यासाठी वनखातेच वातावरणनिर्मिती तर करत नाही ना, अशीही शंका वन्यजीवप्रेमींनी केली. रात्री जंगलात त्याच्या चमूसह फिरणाऱ्या शाफत अली खानमुळे वाघीण आणि बछडे तणावात येऊन गावात शिरले आणि आणखी गावकऱ्यांचे बळी गेले तर त्याला जबाबदार कोण, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. वनखाते सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची पायमल्ली करत आहे. बेशुद्धीकरण करणाऱ्या चमूला कमी आणि शाफत अली खानला अधिक वेळ देत आहे. प्राधिकरणाच्या नियमानुसार वाघिणीला जेरबंद करावे, अशी मागणीही मोर्चेकऱ्यांनी केली. प्रधान मुख्य वनसंरक्षकांना निवेदन चुकीचे काही व्हावे ही आमचीही इच्छा नाही. त्यामुळे आम्हालाही थोडा वेळ द्या. वन्यजीवप्रेमी म्हणून तुम्ही करीत असलेल्या मागण्या योग्य आहेत. त्या वनमंत्र्यांपर्यंत पोहोचवून यातून मार्ग काढण्यात येईल, असे आश्वासन अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये यांनी दिले. त्यांनी मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या डॉ. जेरिल बानाईत व इतरांना प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) ए.के. मिश्रा यांची भेट घालून देण्यासाठी सोबत नेले. मात्र, ‘आमच्यावरही दबाव आहे’ असे सांगून त्यांनी हात झटकले. वन्यजीवप्रेमींनी दिलेले निवेदन वनमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यात येईल, असे आश्वासन ए.के. मिश्रा यांनी दिले. बचाव पथकाला केवळ चार तास दिले जात आहे आणि नवाब मात्र रात्रभर जंगलात फिरतो. त्याच्याविरुद्ध वातावरणनिर्मिती होत असल्याने त्याने गावकऱ्यांना हाताशी धरले आहे. ‘मी येथून गेलो तर वाघिणीचे हल्ले पुन्हा वाढतील. वाघिणीला मारणे हा एकमेव पर्याय आहे’, असे सांगून तो गावकऱ्यांना भडकवण्याचे काम करत आहे, असे यवतमाळच्या ‘एमएच-२९ हेल्पिंग हँड’ या स्वयंसेवी संस्थेचे नीलेश मेश्राम म्हणाले.