एप्रिलमधील बैठकीनंतर हालचालच नाही कृत्रिम पाऊस पाडण्याकरीता केला जाणारा प्रयोग गतवर्षी उशिरा राबवण्यात आल्याने या प्रयोगाचा अपेक्षित परिणाम साध्य करता आला नाही. यंदा राज्य सरकारने पुन्हा एकदा हा प्रयोग राबवण्याचा मानस व्यक्त केला असला तरीही एप्रिलमध्ये यासंदर्भात झालेल्या बैठकीनंतर अजून त्यावर कोणतीही पावले उचलण्यात आलेली नाहीत. भारतीय हवामान खाते आणि हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या स्कायमेट या खासगी संस्थेने यंदा भरपूर पावसाचा अंदाज वर्तविल्याने त्याचाही परिणाम या प्रयोगावर होण्याची शक्यता आता व्यक्त केली जात आहे. कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी वादळी ढगांची गरज असते. अधिक पावसासाठी प्रामुख्याने जुलैमध्ये ढगांना लक्ष्य केले जाऊ शकते. गेल्या वर्षी जूनमध्ये भरपूर पाऊस पडल्यामुळे हा प्रयोग राबवण्याचा निर्णय होऊ शकला नाही. जुलै, ऑगस्टमध्ये पावसाने दडी मारल्यावर सप्टेंबरमध्ये प्रयोग हाती घेण्यात आल्यामुळे अपेक्षित लक्ष्य साध्य करता आले नाही. बंगळुरूच्या ख्याती सिस्टमची निवड या प्रकल्पासाठी करण्यात आली होती. यंदा या प्रयोगावर चर्चा करण्यासाठी एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात वामान खात्याचे सेवानिवृत्त महासंचालक डॉ. रंजन केळकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक झाली. या प्रकल्पाची धुरा कुणाकडे सोपवावी, यासाठी मे महिन्यात निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली. हा संपूर्ण प्रयोग राबवण्यासाठी मंत्रिमंडळाच्या मान्यतेपासून तर विदेश मंत्रालय, गृह मंत्रालय, नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे महासंचालक आदी सर्वाच्या मंजुरीची गरज आहे. त्यासाठी किमान एक महिना लागतो. मात्र, प्रक्रिया कुठपर्यंत आली व प्रयोग राबवणार का, यासंदर्भात आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी यावर फारसे बोलायला तयार नाहीत. गतवर्षी या प्रयोगात महसूल खात्याची भूमिका महत्त्वाची होती. आता या खात्याचे मंत्री एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यामुळे या प्रयोगावरील अनिश्चितीचे सावट गडद झाले आहेत. कृत्रिम पाऊस पाडण्याकरिता विशेष विमान व रडारची गरज असते. गेल्या वर्षी या संपूर्ण प्रयोगात भारतीय हवामान खाते सहभागी नव्हते, त्यामुळे या प्रयोगसाठी लागणारे रडारही त्यांनी दिले नाही. या प्रयोगाची मदार राज्य सरकार आणि खासगी विदेशी कंपनीवर असल्याने अमेरिकेतून रडार मागवण्यात आले होते. मराठवाडय़ात वादळी ढग येण्यास सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊसही येत आहे, त्यामुळे आता जर अधिक पावसासाठी ढगांवर फवारणीचा प्रयोग केला असता तर निश्चितपणे फायदा झाला असता. महाराष्ट्रात जूनमध्ये खरी पावसाची गरज आहे. कारण, या काळात पाऊस चांगला झाला तर शेतकऱ्यांना शेती चांगली करता येईल, असे मत युवा हवामान अभ्यासक अक्षय देवरस यांनी व्यक्त केले. एप्रिलमध्ये झालेली बैठक ही कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी प्रशासकीय बैठक नव्हती. याबाबतचे सर्व निर्णय हवामान खात्याने घ्यावयाचे आहेत.त्यामुळे हा विषय सध्या तरी थांबवून ठेवण्यात आला आहे. - सुहास दिवसे, आपत्ती व्यवस्थापन विभाग महासंचालक प्रयोग राबवायचा किंवा नाही, हा निर्णय शेवटी राज्य सरकारला घ्यायचा असल्याने एप्रिलच्या बैठकीनंतर त्यांनी काय ठरवले, याविषयी माहिती नाही. एवढे मात्र खरे की, कोणताही प्रयोग राबवण्याआधी अभ्यास आणि तयारी असायला हवी; अन्यथा तहान लागल्यावर विहीर खोदण्यात काहीही अर्थ नाही. इतर देशात हे प्रयोग यशस्वी होतात कारण त्यांचे नियोजन असते. भारतात कृत्रिम पावसासाठी धोरण नाही. - डॉ. रंजन केळकर, हवामान विभागाचे सेवानिवृत्त महासंचालक