डॉ. सोनवणे दाम्पत्याचे कथन आमच्या कष्टाचे पैसे आम्हाला मिळत नव्हते तेव्हा भिकाऱ्यांनी आमची मदत केली. आम्हाला प्रोत्साहन दिले आणि माणसात आणले. जगण्याचा खरा अर्थ त्यांच्यामुळेच कळल्याने त्यांच्यासाठीच काम करायचे, असे मनोमन ठरवत भीक न मागण्यास आम्ही काही भिकाऱ्यांना प्रवृत्तही केल्याचे कथन पुण्याचे डॉ. मनीषा आणि डॉ. अभिजित सोनवणे यांनी सांगितले. सोनवणे दाम्पत्याची ओघवती मुलाखत रेखा दंडिगे-घिया यांनी घेतली. १९९८ ते २०१५चा जीवनपट सांगताना त्यांनी अतिशय गरिबी आणि नोकरीनंतर मोठी श्रीमंतीही अनुभवली. मात्र, हे सुख भिकाऱ्यांमुळे मिळाले, याची साक्ष त्यांच्या मनाने दिली आणि दोघांनीही भिकाऱ्यांच्या वैद्यकीय सेवेचे व्रत स्वीकारले. त्यांनी सोशल हेल्थ मेडिकल (सोहम) नावाने संस्था स्थापन केली असून पुण्यातील भिकाऱ्यांना ते सेवा देऊन त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करतात. आतापर्यंत त्यांनी २७ भिकाऱ्यांना भीक न मागण्यास प्रवृत्त केले. भिकाऱ्यांमध्ये सरळसरळ दोन गट पडतात. व्यावसायिक भिकाऱ्यांची साखळी मोठी असून ते तुमच्या आमच्यापेक्षाही श्रीमंत आहेत. मात्र, व्यसनाधीन असल्याचे ते म्हणाले. मुलाखतीच्यापूर्वी डॉ. ज्येष्ठ मेंदूरोग तज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी शाल, रोख रक्कम, पुष्पगुच्छ प्रदान करून सोनवणे दाम्प्त्याचा सन्मान केला. यावेळी अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते गिरीश गांधी होते. आपण काही गोष्टी करू शकत नाही आणि जर इतर कोणी करीत असेल तर आदर वाटतो. सध्या डॉक्टरांची परिस्थिती अतिशय वाईट असून दररोज कुठे ना कुठे मारझोड होते. आता केवळ डॉक्टरांनी पाकिस्तानात जा एवढेच म्हणणे बाकी असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. गिरीश गांधी यांनी पश्चिम महाराष्ट्रात जरी राजकीय वारसाहक्क जपणारे कुटुंब असले तरी सामाजिक वारसा विदर्भात जपला जातो, असे मत व्यक्त करून सोनवणे दाम्प्त्याचे कोडकौतुक केले.