डॉ. आनंद पाटील यांचा आरोप

‘हिंदू’कार डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी मराठय़ांचा चुकीचा इतिहास सांगितला. त्यांच्याशी मी पंचांच्या उपस्थितीत चर्चा करायला तयार आहे. डॉ. नेमाडे हे अनीतीवादी, संधीसाधू आणि सवलती घेणारे जातीयवादी आहेत, असा घणाघाती आरोप प्रसिद्ध तुलनाकार आणि इतिहास संशोधक डॉ. आनंद पाटील यांनी केला.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्रातर्फे आज शुक्रवारी आयोजित ‘सम्राट शिवाजी’ या ग्रंथ प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गिरीश गांधी तर प्रमुख अतिथी म्हणून माजी प्राचार्य डॉ. बबन तायवाडे, अशोक राणा, डॉ. रत्नाकर भेलकर व्यासपीठावर होते. डॉ. पाटील म्हणाले, मराठय़ांचे राज्य मलिक अंबरने स्थापन केल्याचे डॉ. नेमाडे यांचे म्हणणे साफ खोटे आहे. त्यांच्यावर माझी श्रद्धा होती. त्यांना एक पुस्तक अर्पण केले आहे. मात्र, त्यांच्या अनेक गोष्टी खटकणाऱ्या आहेत. सयाजीराव गायकवाड अध्यासनाचे प्रमुख पद त्यांच्याकडे आले आणि त्यांना देशीवाद सुचला पण, मुळातच ते अनीतीवादी, संधीसाधू देशीवादी आणि सवलती घेणारे जातीयवादी आहेत. भारतीय माणूस संकल्पनात्मक आणि ज्ञानाच्या पातळीवर विचार करीत नाही. चांगल्या माणसांचे आपल्याकडे खून होतात आणि ते करणारेच इतिहास लिहितात. आपल्याकडे अज्ञानाचे फारच उत्पादन झाले आहे. आपला इतिहास कमालीचा नासवला गेल्याचे डॉ. पाटील म्हणाले.  गिरीश गांधी आणि डॉ. तायवाडे यांचीही यावेळी भाषणे झाली. प्रास्ताविक डॉ. रत्नाकर भेलकर यांनी केले तर डॉ. कोमल ठाकरे यांनी संचालन केले.

समीक्षकांनी मौनाचा कट रचला

अशोक राणा म्हणाले, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे लेखक म्हणून डॉ. आनंद पाटील यांची ओळख आहे. देशातील १० विद्यापीठांमध्ये त्यांची पुस्तके लागलेली आहेत. मात्र, त्यांच्या बाबतीत मराठी साहित्य समीक्षकांनी मौनाचा कट केला आहे. कारण इतिहासकारांसमोर त्यांनी आव्हान उभे केले आहे. महाराष्ट्रातील लोकांनी काय वाचावे हे ब्राम्हण ठरवतात आणि ते वाईट असल्याचे, शेजुळकर यांनी आधीच लिहून ठेवल्याची आठवण राणा यांनी यावेळी करून दिली. डॉ. पाटील यांच्या पुस्तकात अनेक संदर्भ चकित करणारे असले तरी काही न पटणारेही आहे. त्यामुळे भविष्यात त्यावर लिहिण्याची तयारीही त्यांनी दर्शवली.

‘सम्राट शिवाजी’ या पुस्तकाचे प्रकाशन करताना डावीकडून अशोक राणे, डॉ. आनंद पाटील, गिरीश गांधी, डॉ. बबन तायवाडे.